पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - "कुत्रा पिसाळलेला असल्याचे भासवून त्याला मारण्या'ची कॉंग्रेसची जुनी कार्यपद्धती आहे. राज्य सरकारने सनातन संस्थेच्या विरोधात कोणतेही पुरावे हाती नसताना घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सनातन संस्थेतर्फे हिंदूचे संघटन केले जात असल्यानेच कॉंग्रेस सरकार सनातन संस्थेला विरोध करून बंदी आणण्याची भाषा करीत आहे. गेल्या काही दिवसात संस्थेच्या नावाची बदनामी केली जात आहे, त्याची भरपाई कोण देणार? असा सवालही श्री. वर्तक यांनी उपस्थित केला आहे.
संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेल्या संस्थेच्या साधकांची चौकशी करणे हे अन्यायकारक आहे. त्याचप्रमाणे या जिलेटिन स्फोटाच्या नावाने पोलिस तपास यंत्रणेने जो धुमाकूळ घातला आहे, त्याच्या विरोधातही रीतसर तक्रार सादर केली जाणार आहे. "आम्ही या प्रकरणात नाहीत. उलट आम्ही तक्रारदार आहोत. आम्हाला न्याय हवा' असेही श्री. वर्तक यांनी म्हटले आहे. तसेच मडगाव स्फोटाचा तपास प्राथमिक स्तरावर असताना या स्फोटाची आणि मालेगाव बॉंबस्फोटाचा संबंध असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे. गेल्या काही दिवसात तपास यंत्रणेने आश्रमात टाकलेल्या छाप्यात त्यांच्या हाती आक्षेपार्ह अशी कोणतीच गोष्ट हाती लागलेली नाही. तसेच ज्या वस्तू पोलिसांनी आश्रमातून पंचनामा करून नेलेल्या आहेत, त्या पंचनाम्यावर प्रत्यक्ष साक्षीदाराची सही घेण्यात आलेली नाही, अशी माहितीही श्री. वर्तक यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा