मनमोहनसिंग, सोनिया, राहुलसह अनेकांची उपस्थिती
हैद्राबाद, दि. ४ - "वायएसआर अमर रहे' च्या घोषणांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांना आज सायंकाळी हजारो कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. कडाप्पा जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव पुलूवेंदुला या गावी संपूर्ण राष्ट्रीय इतमामात त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले.
आंध्रच्या जनतेला त्यांचे अंन्त्यदर्शन घेता यावे, यासाठी आज सकाळी त्यांचे पार्थिव लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे ठेवण्यात आले. यावेळी हजारो लोकांनी एकच गर्दी केली होती. हजारो लोक रांगा लावून आपल्या नेत्याचे दर्शन घेत होते. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस राहुल गांधी, अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध पक्षांच्या नेत्यांनीही त्यांचे अन्त्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी शोकपुस्तिकेत आपल्या भावनाही नमूद केल्या. आज हे सर्व नेते एका विशेष विमानाने दिल्लीहून हैद्राबादला आले. त्यात संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सलमान खुर्शीद, वीरप्पा मोईली, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मुख्यमंत्री शीला दीक्षित प्रभृतींचा समावेश होता. या सर्वांनी रेड्डी यांचे अन्त्यदर्शन घेतले व रेड्डी यांचे पुत्र जगन मोहन, पत्नी विजयालक्ष्मी यांचे सांत्वन केले. आंध्रप्रदेशचे राज्यपाल नारायणदत्त तिवारी यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून रेड्डी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आज सकाळी मुख्मंत्री रेड्डी यांच्या बेगमपेठ भागातील निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघाली. फुलांनी आच्छादलेल्या लष्कराच्या एका ट्रकवर त्यांचे पार्थिव तिरंग्याने झाकलेले होते. "वायएसआर अमर रहे' च्या घोषणांनी परिसर निनादून गेला होता. ही अंत्ययात्रा आधी प्रदेश कॉंग्रेस मुख्यालय असलेल्या नामपल्ली येथील गांधी भवनात नेण्यात आली. तेथून ती लालबहादूर शास्त्री स्टेडियममध्ये नेण्यात आली. ही अंत्ययात्रा मार्गक्रमण करीत असताना अनेक लोक ओक्साबोक्सी रडत होते. ट्रकवर रेड्डी यांचे पुत्र खा. जगन मोहन, राज्यसभा सदस्य के. व्ही. पी. रामचंद्र राव, खासदार अझरूद्धीन यांच्यासह रेड्डी यांचे नातेवाईक होते. दुपारी दोन वाजेपर्यंत जनतेच्या दर्शनासाठी त्यांचे पार्थिव स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. नंतर ही अंत्ययात्रा विमानतळापर्यंत नेण्यात आली. तेथून वायुदलाच्या हेलिकॉप्टरमधून रेड्डी यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव, कडाप्पा जिल्ह्यातील पुलीवेंदुला येथे नेण्यात आले. यावेळी रेड्डी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, आमदार आणि हजारो नेते-कार्यकर्ते उपस्थित होते.
रेड्डी यांच्या सन्मानार्थ आज राज्यातील सर्व महाविद्यालये, शाळा, सरकारी कार्यालये, खाजगी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा