मडगाव दि. ६ (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे जंक्शन असलेल्या मडगाव रेल्वे स्टेशनमध्ये बॉंब ठेवल्याचा फोन आज सकाळी ८ वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला आला व सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. नंतर सरकारी यंत्रणांची विलक्षण धावपळ उडाली आणि त्यात ओखा-अर्नाकूलम या गाडी सुमारे सव्वा तास रखडली.
अखेर बॉंबची ती अफवाच असल्याचा निष्कर्ष जेव्हा काढण्यात आला गेला तेव्हा सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला.
रेल्वे स्टेशनवरील फलाट क्र. २ वर हा बॉंब ठेवल्याचा फोन आला तेव्हा त्या फलाटावर ओखा- अर्नाकुलम ही गाडी येत होती. फोन येताच सर्वत्र दक्षतेचा इशारा देण्यात आला. आपत्कालीन स्थिती घोषित झाली. फलाटावरील सर्व दुकाने लगेच बंद झाली. प्रवासी डब्यातच बसून देवाचे नाव घेऊ लागले.
लगेच मडगाव पोलिस व रेल्वे पोलिसांनी या फलाटाला गराडा घातला. पणजीहून बॉंब विल्हेवाट पथक तसेच श्र्वानपथक पाचारण करून फलाटाची व रेल्वे गाडीची तपासणी करण्यात आली. तेथे अंतिमतः काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने ती अफवा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला. मात्र, दरम्यानचा दीड तास प्रचंड मानसिक तणावाखाली गेला. नंतर ओखा एक्सप्रेस आस्ते आस्ते अर्नाकुलमच्या दिशेने रवाना झाली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा