नवी दिल्ली, दि. ११ ः यंदा भारतात शतकातील सर्वांत मोठा दुष्काळ पडला असून, देशाचा आर्थिक विकास दर जेमतेम सहा टक्के राहण्याची शक्यता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी वर्तविली आहे.
आयकर विभागाच्या सर्व मुख्य आयुक्तांसह संचालकांच्या वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. मुखर्जी म्हणाले की, देशातील तब्बल १६१ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडल्यामुळे परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशाचा विकास २००९-१० या वर्षात सात टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण, अनेक भागात पडलेला दुष्काळ आणि अपुरा पाऊस यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात घसरण होणार असल्याचा अंदाज आहे.
ही स्थिती गंभीर आणि चिंताजनक आहे. यापूर्वीच्या शतकात १९८७ मध्ये असा दुष्काळ पडला होता. त्यावेळी आपण अक्षरश: रेल्वेच्या माध्यमातून पाणी ठिकठिकाणी पोचवले होते. गुरांना चारा पोचवला होता. यंदा प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांची समस्या आणखी बिकट झाली आहे. नियोजित पेरणीपेक्षा २० टक्के पेरणी कमी झाली आहे.
यावर्षी जून महिन्यात अतिशय कमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण मागील ८३ वर्षांच्या जून महिन्यातील पावसाच्या प्रमाणापेक्षाही कमी आहे. आत्तापर्यंत अपेक्षेपेक्षा २८ टक्के कमी पाऊस झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २००४ च्या उन्हाळ्यात शेतीतून देशाला जेवढे उत्पन्न मिळाले, त्यापेक्षा तब्बल १२ टक्के कमी उत्पन्न पावसाळ्यात मिळण्याची शक्यता असल्याचेही मुखर्जी म्हणाले.
असे असले तरी देशातील लोकांनी या परिस्थितीमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. दुष्काळाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी चर्चा करीत असून, योग्य त्या समन्वयाने प्रभावी योजना राबविली जाईल, असे आश्वासनही अर्थमंत्र्यांनी दिले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा