Saturday, 25 July 2009

खंडणीसाठी वास्कोच्या तरुणाचे अपहरण

अपहरणकर्त्यांचा गोळीबार, पोलिस कारवाईत चार अटकेत

पणजी, दि. २४ (काणकोण, आगोंद, वास्को व कुंकळ्ळी प्रतिनिधींकडून) ः गोव्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यामुळे चिंतित असलेल्या आम आदमीच्या भीतीत भर घालणाऱ्या अपहरणाच्या दोन घटना आज दक्षिण गोव्यात घडल्याने राज्यात खळबळ माजली आहे. काल रात्री वास्कोहून अपहरण करण्यात आलेल्या अय्याज सय्यद याचा मोठ्या हुशारीने पोलिसांनी बचाव केला, तरीही अपहरणकर्त्यांनी अचानक केलेल्या गोळीबारात एक पोलिस जखमी झाला, तर अन्य तिघे सुदैवाने बचावले. पोलिसांनी रात्री एका धडक कारवाईत सर्व चारही अपहरणकर्त्यांना पकडले. तत्पूर्वी सय्यद याला त्यांच्या तावडीतून पोलिसांनी सोडविले.
पणजीत एका कापड दुकानात नोकरीस असलेला सय्यद (२३) हा नेहमीच रात्री वास्कोला घरी परततो, काल गुरुवारी रात्री ८ वाजता त्याला घरच्यांनी मोबाईलवर विचारणा केली असता आपण वास्कोत परतल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दहा वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या भावाने त्याच्याशी पुन्हा मोबाईलवरून विचारणा केली असता, एका अपरिचित व्यक्तीने " उद्या ११ वाजेपर्यंत १५ लाख रुपयांची व्यवस्था करा, नपेक्षा परिणामांना सज्ज राहा' अशी धमकी दिली. सय्यदच्या कुटुंबीयांनी हा प्रकार थट्टेवारी नेला व आपला मुलगा परत येईल, अशी अपेक्षा ठेवली. तरीही तो न आल्याने मित्रमंडळीशी संपर्क साधला तेव्हा तो कुठच्याच मित्राकडे गेला नसल्याचे त्यांना समजले. सकाळी पुन्हा त्यांना धमकीचा फोन आला, त्यावेळी त्यांनी काही मुदत द्या अशी विनवणी अपहरणकर्त्यांना केली. अखेरची मुदत ३ वाजेपर्यंत देतो, असा इशारा त्यांना मिळाला. पोलिस ठाण्यावर असताना पुन्हा दूरध्वनी आला व राजबाग परिसरात पैसे घेऊन या, असे त्यांना सांगण्यात आले.
युवकाचे वडील सय्यद अजगर अली हे हार्बर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांच्यासह राजबाग येथे गेले असता, त्या ठिकाणी त्यांच्यावर अपहरणकर्त्यांनी गोळीबार केला. यात काणकोण पोलिस स्थानकावरील एक कॉन्स्टेबल जखमी झाला. काणकोणचे पोलिस निरीक्षक सूरज हळर्णकर आणि कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी आपल्या साथीदारांसहित काब - द राम परिसराला वेढा घातला. आगोंदमार्गे येणारी सर्व वाहने त्याचप्रमाणे पोळे चेक नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली.
अपहरणासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हॅन राजबाग डोंगर माथ्यावर सोडून अपहरणकर्ते जंगलात पळून गेले. त्यावेळी त्यांच्या समवेत त्या तरुणाला घेऊन ते पळून गेले. मात्र पोलिसांनी संपूर्ण जंगलात शोधाशोध करून दोन व्यक्तींना अटक करण्यात यश मिळविले. मुलाचे अपहरण करण्यासाठी वापरलेले वाहन (मारुती ओमनी) पांढऱ्या रंगाचे असून त्याचा मूळ नंबर जी. ए. ०१ - आर - ७९५४ असा असून मूळ नंबर बदलून जी. ए. ०१ - एस - ८४०१ अशी नंबरप्लेट तयार करून घेतलेली असून ज्या ठिकाणी मारुती व्हॅन सोडण्यात आली आहे, त्या ठिकाणी फोडलेल्या बाटल्यांच्या काचा तसेच वाहनात पाण्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर निःशस्त्र होते व त्यांच्या सोबत असलेल्या कॉन्स्टेबलवर यावेळी हल्ला झाला. अपहरणकर्त्यांनी यावेळी गोळीबार केला, त्यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २३ रोजी मारुती व्हॅन घेऊन आलेल्या युवकांनी "पिंटो बार' मध्ये जेवण घेतले. तर सकाळी "शांती बार' आणी रेस्टॉरंटमध्ये चहा घेतला. त्या वेळी ते एटीएम कक्षाची चौकशी करीत होते व कोकणी बोलत होते. अपहरण केलेल्या मुलांची वये साधारणपणे २२ ते २५ वर्षे इतकी होती अशी माहिती दिली. या प्रकारामुळे काब - द राम या परिसरात तंग वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या कारवाईत पोलिसांनी सय्यद याच्यासह त्याच्या दोन अपहरणकर्त्यांना अटक केली.नंतर अन्य दोघांनाही शिताफीने अटक करण्यात आली. दिनेश्वर हंडी (आसाम), मोहिद्दीन अली, सरोज, श्रीनिवास (आंध्र प्रदेश) अश या तरुणांची नावे आहेत. आपले कसब दाखवित काणकोण, वास्को व कुंकळ्ळी पोलिसांनी या यशस्वी मोहिमेत भाग घेतला.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making

    Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा