पणजी, दि. २ (प्रतिनिधी) - एप्रिल महिन्यात गोवा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल आज घोषित करण्यात आला असून वाणिज्य शाखेचा ८८. ९९, कला शाखेचा ८६.८३, विज्ञान शाखेचा ८८.४७ तर बीसीए शाखेचा ९४.०५ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत चारही शाखांतील ४, ५६८ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ५४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पदवी परीक्षांचा निकाल सरासरी ८९ टक्के आहे. वाणिज्य, कला व विज्ञान शाखेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली तर, केवळ बीसीए शाखेत मुलांनी बाजी मारली आहे.
गेल्या वर्षी म्हणजे २००८ साली वाणिज्य शाखेचा ८६.२२ , कला शाखेचा ८५.१८, विज्ञान शाखेचा ८८.६२, बीसीए शाखेचा ८८.७५ टक्के निकाल लागला होता तर, २००७ साली वाणिज्य शाखेचा ९०.६८, कला ८१.२५, विज्ञान ८०.६८ तर बीसीए शाखेचा ९५.५२ टक्के निकाल लागला होता.
यंदा वाणिज्य शाखेत २ हजार २१८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ९४ विशेष श्रेणीत, ५३० प्रथम, ८८४ द्वितीय श्रेणीत तर ४६६ सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेत १ हजार २२६ विद्यार्थी बसले होते. त्यात ७७ विशेष श्रेणीत, २४६ प्रथम, ४५७ द्वितीय श्रेणीत तर २८४ सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेत ७२० विद्यार्थी बसले होत. त्यात १९७ विशेष श्रेणीत, २६८ प्रथम, १५५ द्वितीय श्रेणीत तर १७ सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.
बीसीए शाखेत ५९ विशेष श्रेणीत, १०८ प्रथम, १३३ द्वितीय श्रेणीत तर ६४ सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले, अशी माहिती विद्यापीठ परीक्षा विभागाचे प्रमुख जी जे. एस. तळावलीकर यांनी दिली.
जुन्या जमान्यात...!
एका बाजूला तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे ढोल बडविले जात असताना, अनेक सरकारी खाती व शैक्षणिक संस्थांच्या संकेतस्थळांचे उद्घाटन होत असताना गोवा विद्यापीठाने वृत्तपत्रांना मात्र पदवी परीक्षांचे निकाल जुन्या पद्धतीने कागदोपत्री पाठविले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही पूर्ण निकाल उपलब्ध नसल्याने नव्या तंंत्रज्ञानाने चालणाऱ्या वृत्तपत्रांची बरीच गैरसोय झाली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा