मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील कॉंग्रेसमध्ये कोणतेच मतभेद नाहीत, तो संपूर्णतः एक जिनसी आहे अशी ग्वाही कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनी दिली मात्र त्याचबरोबर कोणी मंत्री वा आमदार पक्षीय उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होत नसेल तर त्याला प्रचारासाठी कार्यप्रवण करण्याची व पक्षाला विजयाप्रत नेण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, असे सांगून टाकले.
आज येथील "नानूटेल'मध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सादिर्र्न यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष एकाकीपणे जात असतात याकडे लक्ष वेधले असता त्यांनी एकप्रकारे विजयाची जबाबदारी त्या उभयतांवर ढकलल्यासारखे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पण हरिप्रसाद यांनी त्यांना बोलू दिले नाही.
एका प्रश्र्नावर बोलताना चर्चिल यांची कोणतीच समस्या उरलेली नाही व निवडणूक प्रचारात उतरण्याचे आश्र्वासन त्यांनी दिले आहे असे त्यांनी सांगितले. काल त्याच्या समर्थकांनी आपली भेट घेऊन चर्चा केली व ते समाधानाने परतले असेही त्यांनी सांगितले.
आणखी एका प्रश्र्नावर बोलताना, चर्चिल यांनी आडमुठे धोरण कायम ठेवले तरी त्याचा पक्षाच्या निवडणूक भवितव्यावर काहीच परिणाम होणार नाही. कोणत्याही पेचप्रसंगाचे संधीमध्ये रुपांतर करण्याची किमया कॉंग्रेसकडे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी या निवडणूक प्रचारासाठी १५ रोजी गोव्यात येत असून त्यांच्या प्रचारसभेच्या तयारीसाठी आपण गोव्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सभेस सर्व आमदार सहभागी होतील, ते म्हणाले. सोनियांची सभा फक्त दक्षिणेतच ठेवली गेली उत्तरेत का नाही, असे विचारता दक्षिणेतच कॉंग्रेसचा उमेदवार आहे शिवाय हा भाग मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघालगत येतो, असे ते उत्तरले.
तत्पूर्वी प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी प्रचाराची पहिली फेरी आटोपलेली असून या फेरीत १५० ते१७५ कोपरा सभा आपण व मुख्यमंत्र्यांनी मिळून घेतल्याचे सांगितले. प्रचाराचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरु होत असून आतापर्यंत मिळत असलेल्या प्रतिसादावरून सार्दिन यांना ५० ते ६० हजारांचे मताधिक्य मिळेल असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी इतरांबरोबर नगरविकास मंत्री जोकीम आलेमांव व उपसभापती माविन गुदिन्हो हेही हजर होते.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा