शरयु गस्तीनौकेचे जलावतरण
वास्को, दि. ३० (प्रतिनिधी)- सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देशातील विविध शिपयार्डांमध्ये नौदलासाठी ३२ लढाऊ जहाजे व ६ पाणबुड्या बांधण्याचे काम सुरू आहे. देशातील अनेक जहाज बांधणी व्यवस्थापनांनी वेगवेगळ्या स्तरावर प्रगती साधली आहे, त्यांनी आणखी प्रगती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल सुरेश मेहता यांनी केले.
आज दुपारी गोवा शिपयार्डतर्फे भारतीय नौदलासाठी बांधण्यात आलेल्या "आयएनएस शरयु' या पेट्रोलवर चालणाऱ्या गस्तीनौकेच्या जलावतरण समारंभाला भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल सुरेश मेहता प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते.यावेळी ऍडमिरल मेहता यांच्या पत्नी श्रीमती मारिया तेरेसा पेरेरा, गोवा शिपयार्डचे संचालक ए. के. हंडा, गोवा नौदल विभागाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले, गोवा किनारा रक्षक दलाचे प्रमुख एम.एस. डांगी, मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष क्रीतेश गावकर, नौदल व गोवा शिपयार्डचे अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
ऍडमिरल मेहता यांनी पुढे बोलताना सांगितले की, १९६१ साली देशाच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेल्या पहिल्या युद्धनौकेनंतर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, ही एक देशासाठी गर्वाची गोष्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नौदल विभागातर्फे नजीकच्या काळात विविध पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगून कोचिन येथे बांधण्यात येत असलेले जहाज सर्वांत मोठे जहाज ठरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. गोवा शिपयार्ड तसेच भारतातील इतर काही शिपयार्डांनी आता आणखी जबाबदारी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गोवा शिपयार्डचे संचालक ए. के. हंडा यांनी शरयु ही गस्ती नौका गोवा शिपयार्डमध्ये बांधण्यात येत असलेली सर्वांत मोठी गस्ती नौका असल्याचे सांगितले. नियोजित कालावधीत उत्तम निकाल देणे हाच गोवा शिपयार्डचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले.
ऍडमिरल मेहता यांच्या पत्नी श्रीमती मारीया तेरेसा पेरेरा यांच्यातर्फे श्रीफळ वाढवण्यात आल्यानंतर "जीएसएल यार्ड ११९४' मध्ये बांधण्यात आलेल्या "शरयु' या नौदलाच्या गस्तीनौकेचे मोठ्या थाटात जलावतरण करण्यात आले. गोवा शिपयार्ड तर्फे बांधण्यात आलेली ही गस्ती नौका १०५ मीटर लांबीची असून त्याची रुंदी १२.९० मीटर आहे. १६ अधिकाऱ्यांसह ११८ कर्मचारी या जहाजावर तैनात केले जातील. समुद्राच्या हद्दीत होणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवणे तसेच युद्धाच्या वेळी समुद्रातून सहभागी होण्यासाठी ही नौका परिपूर्ण आहे.
२०२२ पर्यंत १६० युद्धनौकांचे लक्ष्य : नौदलप्रमुख
इ.स.२०२२ पर्यंत भारतीय नौदलाजवळ १६० मोठ्या युद्धनौका तसेच ३०० लढाऊ विमानांचा ताफा असावा, असे लक्ष्य भारतीय नौदलाने ठेवलेले आहे, असे नौदलप्रमुख ऍडमिरल सुरेश मेहता यांनी आज येथे सांगितले.
यासंदर्भात आम्ही एक प्रदीर्घ योजना आखली असून त्याअंतर्गत २०२२ पर्यंत देशाला किती व कोणकोणत्या प्रकारच्या युद्धनौकांची गरज आहे हे लक्षात घेऊन त्याच्या बांधणीस आम्ही सुरुवात केलेली आहे, असे ते पुढे म्हणाले.
भारतीय नौदलाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही एक कृती कार्यक्रम राबवीत आहोत, असे सांगून मेहता पुढे म्हणाले, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही आता लहान लहान लढाऊ नौकांच्या निर्मितीकडे लक्ष देणार आहोत. देशाच्या समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने आम्ही तीन स्तरावरील सुरक्षा अमलात आणणार आहोत. पहिला स्तर हा नौदलाचा राहील. त्यानंतरचा स्तर भारतीय किनारा रक्षक दल सांभाळील तर तिसऱ्या स्तराची जबाबदारी राज्य सरकारांना सांभाळावी लागणार आहे. किनारी भागात पोलिस ठाणी उभारण्यास समुद्र किनारा लाभलेल्या सर्व राज्यसरकारांना सांगण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा