मडगाव, दि. २२(प्रतिनिधी) : विवाहानंतर मधुचंद्रासाठी नवी दिल्लीहून गोव्यात आलेल्या एका तरुण दांपत्यासाठी कोलवा किनाऱ्यावरील जलक्रीडा त्यांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करणारी ठरली आहे. तेथील "बनाना बोटी'तून जलक्रीडेसाठी हे जोडपे गेले असता ती बोट उलटून झालेल्या अपघातात या जोडप्यातील तरुण समुद्रात बुडाला, तर त्याची पत्नी सुदैवाने बचावली. तिला हॉस्पिसियू इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
योगेश अगरवाल (२७) व नेहा (२२) यांचा आठवडाभरापूर्वींच विवाह झाला होता. नंतर ते मधुचंद्रासाठी गोव्यात आले व उत्तर गोव्यातील एका हॉटेलात उतरले. आज सकाळी कोलवा किनाऱ्यावर भटकंती करायची व सायंकाळी मडगावचा कार्निव्हल पाहून परत फिरायचे असा त्यांचा बेत होता. दुपारी किनाऱ्यावर फिरताना या "बनाना बोटींतून' ती जलक्रीडेला गेली असता बोट पाण्यात उलटली व तिच्याखाली सापडल्यामुळे योगेश मरण पावला आणि नेहा बचावली.
कोलवा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित बोटीचा चालक व त्याच्या साहाय्यकाविरुद्ध बेदरकारपणाबद्दल गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक एडविन कुलासो तपास करीत आहेत. मृतदेह हॉस्पिसियूच्या शवागरात ठेवला असून उद्या शवचिकित्सा केली जाईल.
यापूर्वी याच किनाऱ्यावर बनाना बोट उलटून तिचा चालकच बोटीखाली अडकून मरण पावला होता. त्यानंतर तशाच प्रकारचा हा दुसरा अपघात आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा