मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : गेले चार दिवस सोनसोडो कचरा यार्डात धुमसत असलेल्या आगीमुळे मडगाव परिसरावर आरोग्याचे संकट उदभवण्याचा धोका निर्माण झाला असून ही आग विझविण्यास जितके अधिक दिवस जातील तेवढे हे संकट तीव्र होत जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने आज येथील आगीची व परिसरात दाटलेल्या धुराची पहाणी केल्यानंतर सर्व संबंधितांची पाचावर धारण बसली व त्यानंतर नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्या संदर्भातील सविस्तर अहवाल २४ तासांत सादर करण्याचा आदेश दिला.
आज सायंकाळी मंत्री आलेमाव यांनी सोनसोडोला भेट दिली तेव्हा पालिका प्रशासन संचालक दौलतराव हवालदार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राजेंद्र कामत व वीराज वायंगणकर हे हजर होते. त्यांनी आगीने पेट घेतलेल्या कचऱ्यात केवळ प्लास्टिकच नव्हे तर विषारी वायूची निर्मिती करणाऱ्या वस्तूंचाही समावेश असल्याने अशा वायुमुळे फुफ्फुसाचे, मूत्रपिंडाचे व मेंदूचे विकार मोठ्या प्रमाणात बळावण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे मंत्र्यांसह सर्व उपस्थित भांबावले. त्यांनी लगेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांचा हवा प्रदूषणविषयक सर्वसमावेशक अहवाल उपाययोजनांसह २४ तासांत सादर करण्याचे फर्मान सोडले. परिसरातील नागरिकांनी यावेळी मंत्र्यांना कालपासून ते ज्या परिस्थितीचा सामना करीत आहेत त्याची कल्पना दिली.
नंतर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना नगरपालिकेने हायक्विपला ज्या प्रकारे हाकलले त्यातून ही स्थिती निर्माण झाल्याचा ठपका ठेवला.
सोनसोड्यावरील "लॅंड फिलींग' प्रस्तावाचे काय झाले असे विचारता मंत्री म्हणाले, पालिकेकडून अजून केाणताही प्रस्ताव आलेला नाही . मोठी रक्कम असली की योग्य प्रकारे प्रस्ताव व योजना तयार करून पाठविणे आवश्यक असते. सर्व प्रक्रिया निविदाव्दारेच करावी लागेल. निविदेविना एकही पैसा मिळणार नाही. ४ कोटीची रक्कम लॅंड फिलींगसाठी रोख मिळेल अशा भ्रमात असलेल्या पालिका मंडळाच्या शिडातील हवाच काढून घेतली.
---------------------------------------------------------------
आणखी प्रस्ताव
दरम्यान कॉमेक्स, हायक्विप व गोवा फाऊंडेशन यांच्यानंतर सोनसोडो येथील कचरा समस्या आपण चुटकी सरशी सोडवतो, असा एक प्रस्ताव रुझारियु दांतूश नामक एका व्यक्तीने आज मंत्री ज्योकिम यांच्यासमोर मांडला. गेली २३ वर्षें विदेशांत अशी कामे करत असल्याचा दावाही त्यांनी केला. आपणाला एक बुलडोजर, २ शॉवेल व आवश्यक सामग्री दिली तर ही समस्या आपण काही दिवसातच दूर करू, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्र्यां सोबत असलेले श्री. हवालदार यांनी याप्रकरणी काहीही बोलण्याचे टाळले.
सरकार अपयशी : दामू नाईक
सोनसोडो प्रकरणात आपण वारंवार आवाज उठवत होतो व आपण व्यक्त क रीत असलेली भीतीच खरी असल्याचे या आगीने दाखवून दिले, अशी टीका फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी केली आहे. ते म्हणाले की ही आग आपसूक लागलेली नाही तर मुद्दाम लावली गेली आहे.
कचरा विल्हेवाट व प्रक्रिया प्रकरणात सरकारला जसे अपयश आले तसेच आगीवर नियंत्रण आणण्यातही सरकारी यंत्रणेला अपयश आले आहे. प्रत्येक बाबतींत टक्केवारी लाटण्याची संबंधितांची प्रवृत्तीच याला जबाबदार आहे. आपण पालिकेने ही प्रक्रिया करण्यास सुरवातीपासून विरोध केला होता. गेले दोन महिने पालिकेने तेथे २३ कामगार कामाला लावले होते त्यांनी नेमके काय काम केले त्याचा कोणताच पत्ता या आगीमुळे आता लागणार नाही. सोनसोडो कचरा प्रकल्प सर्व संबंधितांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडीच ठरली होती, असा आरोप त्यांनी केला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा