नवी दिल्ली, दि. १७ ः दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मुंबईत मृत्यू झाला हे निश्चित असले तरी त्यांना अतिरेक्यांनीच मारले का, अशी शंका माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री ए. आर. अंतुले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे.
अनेकजण मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी त्यांच्या चौकशीमुळे नाराज होते. त्यामुळे करकरेंसारखा अधिकारी या हल्ल्यात इतक्या सहजपणे मृत्युमुखी पडतो, ही साधी गोष्ट नाही. त्यांचा मृत्यू अतिरेक्यांनी केला की आणखी कशामुळे झाला याबाबत शंका निर्माण होऊ शकते, असे अंतुले यांनी सांगितले.
करकरे हे अत्यंत शूर आणि धाडसी अधिकारी होते. मालेगाव स्फोटाची चौकशी करकरे करत होते, त्यात मुस्लिमेतर अतिरेकी असल्याच्या शक्यतेचा ते शोध घेत होते. यातच त्यांची हत्या होणे, हे संशयास्पदच आहे. नाहीतर ताज आणि ऑबेरॉय येथे गोळीबार सुरु असताना करकरे कामा हॉस्पिटलजवळ कशाला गेले असा प्रश्न पडतो, असे अंतुले म्हणाले.
कॉंग्रेसची भंबेरी
दरम्यान, अंतुले यांच्या या विधानामुळे कॉंग्रेस पक्ष कमालीचा अडचणीत आला असून पक्ष प्रवक्ते अभिषेक मनू संघवी यांनी अंतुले यांचे ते वैयक्तिक मत आहे, पक्षाचे नव्हे असे सांगत पक्षाची बाजू कशीबशी सावरून नेली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा