नवी दिल्ली, दि. २१ - जगभरात गाजत असलेल्या दहशतवादाच्या मुद्यावरुन दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानला तडाखेबाज प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशाच्या सुरक्षा तयारीचा आढावा घेण्यात आला. यानिमित्ताने प्रत्युत्तराची तयारी भारताने सुरु केल्याचे मानले जात आहे.
मुंबईवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युध्दाची ठिणगी कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. मात्र पाकिस्तानशी युध्द करण्याची घाई भारताने करु नये, असा दबाव भारतावर आहे. मात्र दहशतवाद्यांवर पाकिस्तान कठोर कारवाई करणार नसेल आणि या कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करु देत असेल तर पाक ला धडा शिकवण्यासाठी भारताने व्यूहरचना तयार केल्याचे समजते. पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारतासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे विधान केंद्रीय परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर काल संध्याकाळी बैठक झाल्याने प्रत्युत्तराच्या तयारीची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.या बैठकीत नेमके काय ठरले याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा