मुंबई, दि. १५ : इंडियन बॅंक असोसिएशनने आज २० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात जाहीर केली आहे.
याविषयीची माहिती भारतीय स्टेट बॅंकेचे अध्यक्ष ओ.पी. भट्ट यांनी दिली. या नव्या निर्णयानुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजाचे दर ८.५० टक्के तर पाच लाख ते वीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर ९.२५ टक्के राहतील. त्याबरोबरच कर्जमंजुरीसाठी कोणतेही प्रक्रियाशुल्क आकारले जाणार नसून वीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जांना मोफत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
व्याजदर कपातीचा निर्णय फक्त राष्ट्रीयकृत बॅंकांपुरताच मर्यादित असला तरी स्पर्धेमुळे खाजगी बॅंकांनाही व्याजदर कमी करावेच लागतील, असा अर्थमंत्रालयाचा अंदाज आहे. ही योजना ३० जून २००९ पर्यंतच्या कर्जांसाठी लागू राहणार आहे.
व्याजदर कमी करण्याच्या मोबदल्यात जोखीम दर आणि निव्वळ व्याजाचा फरक (नेट इंटरेस्ट मार्जिन) पाच लाखांपर्यंतच्या कर्जांवर १० टक्के आणि त्यापुढील २० लाखांपर्यंतच्या कर्जावर १५ टक्के इतके कमी करण्यात आले आहेत. वीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा, राष्ट्रीय गृहनिर्माण बॅंकेस (एनएचबी) चार हजार कोटी रुपयांचा पुनर्वित्तपुरवठा असे निर्णय सरकारने यापूर्वीच घेतले आहेत.
जागतिक स्तरावरील आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी केंद्राने एकापाठोपाठ अनेक पॅकेजच्या घोषणा केल्या आहेत. रोजगारनिर्मितीची सर्वाधिक क्षमता असलेल्या गृहबांधणी उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा