ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांची खंत
प्रीतेश देसाई
पणजी, दि. २३- "करोडो रुपये खर्च केले म्हणून दर्जेदार चित्रपट बनत नाही. शरीर चांगले, पण त्यात आत्माच नाही,' अशी अवस्था सध्याच्या चित्रपटांची झाल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते व निर्माते रणधीर कपूर यांनी "बिग बजेट' चित्रपटांबद्दल बोलताना व्यक्त केली.
ते आज सकाळी मॅकानिज प्लाझामधे "शॉर्ट फिल्म सेंटर'चे उद्घाटनप्रसंगी आले असता बोलत होते. चित्रपटांचा दर्जा पैशांवरून ठरत नाही. पूर्वी चित्रपटाच्या कथेला अधिक महत्त्व दिले जायचे. बजेट कमी असायचे तरीही दर्जेदार चित्रपट रसिकांना पाहायला मिळत होते. आगामी काळात माझ्या स्वप्नातील चित्रपट साकार करण्याची इच्छा आहे' असे श्री. कपूर पुढे म्हणाले.
"गोव्याची "शीतकडी' आपल्याला अत्यंत प्रिय आहे. कधीकधी केवळ या जेवणाचा आनंद लुटण्यासाठीच गोव्याची वारी करतो आपण गोव्याची वारी करतो, असे त्यांनी हसत हसत सांगितले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपयुक्त अशा वातावरणाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास गोव्याशिवाय ते अन्य कोठेच उपलब्ध होणार नाही, असे निरीक्षण दिग्गज चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी नोंदवले. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी काही राज्यांची चढाओढ सुरू होती, त्यावेळी आपण गोव्यातच हा महोत्सव व्हावा यासाठी प्रयत्न केले होते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा