पणजी, दि.७ (प्रतिनिधी) - राज्यातील शाळांना असलेली दिवाळीची सुट्टी दोन दिवसांनी पुढे ढकलण्याची मागणी आचारसंहितेमुळे मान्य होऊ न शकल्याने सर्व शाळा येत्या १० नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत.
दरम्यान,सध्या दिवाळीची सुट्टी सुरू आहे. येत्या १० रोजी तुलसी विवाह असल्याने व हा उत्सव राज्यात मोठी दिवाळी म्हणून साजरा होतो त्यामुळे ही सुट्टी दोन दिवस पुढे ढकलण्याची मागणी अनेकांनी शिक्षण खात्याला केली होती. हा प्रस्ताव खात्याकडून सरकारला पाठवण्यात आला होता परंतु राज्यात पाळी पोटनिवडणुकीनिमित्ताने आचारसंहिता लागू झाल्याने हा निर्णय घेणे शक्य नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. दिवाळीची सुट्टी जाहीर करतेवेळीच या गोष्टीचा विचार होण्याची गरज होती. कोणताही निर्णय घेताना सविस्तर विचार करण्याची तसदी कुणीही घेत नसल्याने तसेच वरिष्ठांचेही याकडे लक्ष नसल्याने असा गोंधळ होतो,असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा