गुवाहाटी, दि.३१ : आसाममधील बॉम्बस्फोट मालिकेत दगावणाऱ्यांची संख्या ७७ वर पोहोचली असून रात्रभरात ११ जखमी मृत्यूमुखी पडले.
राज्याच्या गृहसचिवांनी याबाबत माहिती दिली. काल राज्यातील बळीसंख्या ६६ होती. रात्रीतून सुमारे ११ जखमी मरण पावल्याने ही संख्या ७७ वर पोहोचली आहे. या स्फोटात एकट्या गुवाहाटीत ४१ लोक दगावले. बारपेटा येथील तीन जण रात्री दगावल्याने तेथील बळीसंख्या १५ झाली आहे. कोकराझार येथे एकूण २१ लोक मृत्यूमुखी पडले.
आसाममधील स्फोटांचा फटका गुवाहाटी, कोकराझार, बोंगाईगाव, बारपेटा यांना सर्वाधिक बसला. या हल्ल्यांमागे बांगलादेशातील हुजी या अतिरेकी संघटनेचा हात असावा, अशी शंका व्यक्त केली जात असून त्या दिशेने तपास सुरू आहे. उल्फाने या स्फोटातील सहभाग नाकारला असला तरी पोलिसांना मात्र या संघटनेविषयी दाट शंका वाटत आहे. हे स्फोट घडवून आणण्यासाठी उल्फाने हुजीची मदत केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
पोलिस तपासाची सूत्रे उल्फा-हुजीच्या दिशेने
७७ लोकांचे प्राण घेणाऱ्या आसाममधील स्फोटांची चौकशी राज्य पोलिसांनी सुरू केली असून त्यांच्या तपासाची चक्रे हुजी आणि उल्फाच्या भोवतीच फिरत आहेत.
पोलिसांचे म्हणणे आहे की, उल्फाने या स्फोटात आपला हात नसल्याचे म्हटले असले तरी ही बाब आम्ही फारशी गंभीरतेने घेतलेली नाही. त्यांच्या नकाराला आमच्या दृष्टीने काहीही अर्थ नाही. उल्फाने आजवर जेहादींना संरक्षण आणि प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या कारवाया लक्षात घेता या स्फोटातही ते सामील असल्याचा इन्कार केला जाऊ शकत नाही.
उल्फाला आसाममधील कानाकोपऱ्याची माहिती आहे. त्यांच्या मदतीशिवाय कोणतीही अतिरेकी संघटना राज्यात उत्पात माजवू शकत नाही. त्यामुळे उल्फानेच या कारवायांमध्ये मदत केली असावी, असा आमचा पक्का विश्वास असल्याचे पोलिसांनी सांगितले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा