आगरतळा, दि. १ (प्रतिनिधी) : अहमदाबाद, जयपूर, नवी दिल्ली अशा प्रमुख शहरांत अतिरेक्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकांमुळे देशात जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली असतानाच आज रात्री त्रिपुराची राजधानी असलेल्या आगरतळा शहरात तीन ठिकाणी झालेल्या स्फोटांत ५० हून अधिक जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे तिन्ही स्फोट अर्ध्या तासात घडले. जखमींपैकी दहा जणांची स्थिती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिला स्फोट येथील गजबजलेल्या गोल बाजारात झाला, त्यानंतर लगेच जवळच्या जीबी नगर व बसस्थानकावर आणखी दोन स्फोट झाले. जखमींमध्ये अनेक महिलांचा समावेश असून, त्यांना जवळच्या पंत वैद्यकीय इस्पितळात हलविण्यात आले. पहिला स्फोट संध्याकाळी ७.३० वाजता झाला, त्यानंतर पाच मिनिटांनी दुसरा तर तिसरा स्फोट ८.१५ वाजता झाला. स्फोटानंतर दुकानदारांनी आपली दुकाने लागलीच बंद केली. रात्री उशिरापर्यंत या स्फोटासंबंधी अधिक तपशील मिळू शकला नाही.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा