Thursday, 23 October 2008

राज ठाकरेंची सुटका, जामीन व अटकपूर्व जामीनही मंजूर

- २४ ऑक्टोबरपर्यंत दिलासा
- "मनसे'मध्ये प्रचंड जल्लोष
- सरकारचे मनसुबे विफल

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी): रत्नागिरीत काल पहाटे अटक करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (बुधवारी) सायंकाळी कल्याण येथे जामिनावर सुटका झाली. त्याचबरोबर त्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत अटकपूर्व जामीनही मिळाल्याने त्यांची लगेच होणारी अटकही टळली आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्‌या प्रकरणांत अडकवण्याचा महाराष्ट्र सरकारचा डाव तूर्त फसला आहे.
ज्या प्रकरणात राज यांना कालची रात्र डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात काढावी लागली होती, त्या प्रकरणात कल्याणच्या न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देत नंतर जामीन मंजूर केला. तसेच कल्याण सत्र न्यायालयाने दोन दिवसांचा अंतरिम अटकपूर्व जामीन दिला व त्यावरील सुनावणी २४ ऑक्टोबरला ठेवली आहे. परिणामी तोपर्यंत राजला अटक करणे पोलिसांना शक्य होणार नाही.
ठिकठिकाणी गुन्ह्यांची नोंद
दरम्यान, राज यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे नोंदविण्याचा सपाटा लावला आहे.मुंबईत कांजूरमार्ग येथे, ठाण्यात, पंढरपुरात, फलटणमध्ये, साताऱ्यात, जालना भागात १०-१२ ठिकाणी, सोलापूर जिल्ह्यात ६ ठिकाणी, जळगाव जिल्ह्यात ३ आणि नाशिक जिल्ह्यात ४ ठिकाणी मिळून एकूण सुमारे ३० गुन्हे राजविरुद्ध नोंदविण्यात आले आहेत.
अशा प्रकारे हेतुपूर्वक गुन्हे नोंदविले जात असतील तर त्याविरुद्ध आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा राज यांचे वकील अखिलेश चौबे यांनी दिला आहे.
हे सर्व गुन्हे आणि राज्याबाहेरीलही या विषयावरील गुन्हे राज्यातील एकाच न्यायालयात चालवण्याची विनंती करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पत्नीचे पोलिस ठाण्यापुढे धरणे
कालची रात्र राज यांनी मानपाडा पोलिस ठाण्याच्या कच्च्‌या कैदेतच घालविली. आज सकाळी त्यांची पत्नी शर्मिला व इतर नातेवाईक त्यांना भेटायला गेले असता, पोलिसांनी एकट्या शर्मिला यांनाच आत सोडण्याची तयारी दाखविली. याचा निषेध म्हणून त्यांनी बराच वेळ ठाण्याबाहेर धरणे धरले. शेवटी, दुपारी दोनच्या सुमाराला राज यांना कल्याणच्या न्यायालयात नेण्यापूर्वी या पती-पत्नीची भेट घडवून आणण्यात आली.
नंतर सौ.शर्मिला कल्याणच्या न्यायालयात गेल्या. तेथे जामीन व अटकपूर्व जामीन मिळून राजची सुटका झाल्यानंतर त्यांना सोबत घेऊनच त्या दादरमधील "कृष्णकुंज' निवासस्थानी परतल्या. तेथे राजच्या मातोश्री कुंदाताई, पत्नी व इतर महिलांनी ओवाळून राजचे स्वागत केले, तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद साजरा केला.
दिवसभर संदिग्धता
कालच्याप्रमाणेच आजही राज यांना पुन्हा अटक केली जाते की काय, अशी शक्यता सकाळपासूनच व्यक्त होत होती. जामीन मिळाला नाही किंवा पुन्हा अटक झाली तर पुढे काय, असा प्रश्नही विचारला जात होता.
दुपारी राज यांना कल्याणच्या न्यायालयात आणण्यात आले त्याचवेळी रेल्वे पोलिसांचे एक पथक तेथे पोचले. कल्याण व ठाणे रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनांच्या संदर्भात या दोन्ही रेल्वे पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. डोंबिवलीच्या प्रकरणात न्यायालयाने राज यांना जामीन दिला तर लगेच आपण कोठडी मागायची, या तयारीतच ते आले होते. तथापि, आम्ही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे व त्यावर सुनावणी सुरू आहे. तेव्हा थोडा वेळ वाट पाहावी, अशी विनंती राज यांच्या वकिलांनी केली व न्यायालयाने ती मान्य केली. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अंतरिम स्वरूपात मंजूर करून राजला २४ पर्यंत अटक करण्यास पोलिसांना मनाई केली. याबरोबरच राज यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. त्याचबरोबर मनसे कार्यकर्त्यांच्या मनावरील दिवसभराचा ताण निवळला.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा