नवी दिल्ली, दि. १९ : जगभरात मंदीची लाट आली असताना, शेअर बाजार कोसळले असताना सोन्याच्या भावात तेजी आली असल्याने अनेक लोकांनी शुक्रवारी आपल्याजवळचे सोने विकून पैसा कमाविला. बुधवारी जे सोने एका ग्रममागे १२१० रुपये होते, ते गुरुवारी अचानक वाढून १३१० रुपये झाले. त्यामुळे सोने विक्रीचा व्यवहार फायद्याचा असल्याचे हेरून अनेकांनी आपल्याजवळचे सोने विकले.
गणेशोत्सव आटोपल्यानंतर आता पितृपक्ष सुरू असल्याने बाजार तसाही ओस पडला आहे. इतर व्यवसायाप्रमाणेच सराफा व्यवसायही सध्या थंड आहे. त्यामुळे सराफा दुकानांमध्ये शुक्रवारी जी काही गर्दी होती, ती सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची नव्हे, तर विकायला आलेल्यांची होती.
शेअर बाजारात आलेली मंदी बघता "जुने ते सोने' या म्हणीची आठवण होत आहे. शेअर बाजार आज जेवढा फोफावला आहे, तेवढा पूर्वीच्या काळी कधीच नव्हता. लोक सोन्यात पैसा गुंतवायचे. गरज पडेल तेव्हा सोने विकून पैसा मिळवायचे. आजही लोकांनी तेच केले. अनेक जण या व्यवहारामुळे फायद्यात राहिले.
सोन्यापेक्षाही हिरे खरेदीत पैसा गुंतविण्याकडे लोकांचा कल आहे. कारण, हिऱ्यांचे भाव कधीच कमी होत नाहीत. सोन्याचे भाव सतत चढत वा उतरत असतात. त्यामुळे लोक सोन्याचांदीपेक्षाही हिरे खरेदी करून पेसा गुंतवितात, असे हैदराबाद येथील सराफा व्यापारी प्रमित अग्रवाल यांनी सांगितले.
सोन्याचे भाव गुरुवारी प्रति दहा ग्रॅम एकदम हजार रुपयांनी वाढल्यामुळे सोन्याच्या विक्रीत २० टक्के घट झाली आहे. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. कारण सोन्याचे भाव सतत खाली-वर होत असतात. आज वाढलेले भाव पुन्हा कमी होऊ शकतात. तेव्हा पुन्हा विक्री वाढेल, असे अग्रवाल यांनी सांगितले.
भारतासह संपूर्ण जगात शेअर बाजार कोसळत असताना भारतात हिऱ्यांच्या विक्रीत ६० टक्के वाढ झाली असून, मोत्यांच्या विक्रीतही ४० टक्के वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वाधिक वाढ असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा