पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): करंझाळे किनाऱ्यावर गेले दहा दिवस मच्छीमार खात्याच्या नाकावर टिच्चून ट्रॉलर्सवाल्यांकडून मासेमारी सुरू असल्याची तक्रार "गोंयच्या रापणकारांचो एकवट'या संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
संघटनेचे सरचिटणीस माथानी साल्ढाणा यांनी यासंबंधी मच्छीमार संचालकांना पत्र लिहिले आहे.ट्रॉलर्सकडून खोल समुद्रात मासेमारी करणे अपेक्षित असताना करंझाळे किनाऱ्यावर मासेमारी केली जात असल्याने त्यामुळे पारंपरिक रापणकारांच्या व्यवसायावर गदा आल्याचे त्यांनी सांगितले. मुळातच गेल्या काही महिन्यांपूर्वी तेथे एक जहाज रुतल्याने रापणकारांना मासेमारी करणे शक्य झाले नव्हते. परिणामी तेव्हा त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आता व्यवसाय मासेमारी सुरू होतानाच ट्रॉलर्सवाल्यांकडून अतिक्रमण होत असल्याने छोट्या व्यावसायिकांनी नेमके काय करावे, हे सरकारनेच सांगावे असा संतप्त सवाल माथानी यांनी विचारला आहे. येत्या चोवीस तासांत जर तेथून ट्रॉलर्स हटवले गेले नाही तर आपल्या अस्तित्वासाठी या रापणकारांना स्वतःहून कृती करावी लागेल व होणाऱ्या परिणामांना मच्छीमार खाते जबाबदार राहील,असा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती पणजी पोलिस स्थानक तथा ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा