स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली, दि. १५ : काश्मीरमधील श्री अमरनाथ हे पवित्र देवस्थान सर्व भारतीयांना एकजुटीने वाटचाल करण्याची प्रेरणा देते. भक्तांची सोय करण्यासाठी निवारा उभारण्याचा प्रश्न सद्भाव व शांततापूर्ण वातावरण निर्मितीतूनच सुटू शकतो, असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमावेळी व्यक्त केला. धर्माच्या नावावर फूट पडल्यास देशाच्या एकतेला व अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
जम्मू-काश्मीरमधील सध्याची स्थिती चिंता वाटण्यासारखी आहे असे सांगून विकासासाठी त्या राज्यात आणि ईशान्येकडील राज्यांत शांती निर्माण करण्याची आज गरज आहे, असे डॉ. सिंग यांनी सांगितले. हवामानातील बदल, जागतिक तापमानवाढ आदी समस्यांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. देशात सर्व प्रकारचा विकास करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असे सांगितले. यावर्षी आपला देश चांद्रयान पाठविणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा