अहमदाबाद बॉम्बस्फोट मालिकेचे तार नवी मुंबईशी जुळलेले दिसून आलेले आहेत. स्फोट होण्याच्या तीन मिनिटांपूर्वी ज्या ई-मेलवरून स्फोट होण्याची सूचना देण्यात आली होती तो ई-मेल सानपाडा परिसरातून पाठविण्यात आला असल्याचे चौकशीतून स्पष्ट झालेले आहे. "काही मिनिटांतच स्फोट होणार आहेत. हे स्फोट रोखायचे असतील तर रोखून दाखवा,'असे या ई-मेलमध्ये म्हटले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि रिलायन्स उद्योग समूहाचे उद्योगपती मुकेश अंबानी या दोघांनाही या ई-मेलमध्ये धमकी देण्यात आली होती. स्फोटांनंतर हा ई-मेल काही मिनिटांतच विविध टीव्ही वाहिन्यांना तसेच वृत्तपत्रांच्या कार्यालयांना पाठविण्यात आला होता. याहूच्या वेबसाईटवर "अलअरबी गुजरात' या नावाने हा ई-मेल पाठविण्यात आला होता. "इंडियन मुजाहिदीन'च्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या ई-मेल अकाऊंटच्या चौकशीतून लक्षात येते की, या संघटनेला भारतात सक्रिय असलेल्या सिमी व लष्कर-ए-तोयबाची मदत मिळालेली आहे, असे सुरक्षा संस्थांनी म्हटलेले आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)नवी मुंबईच्या सानपाडा येथील पाम बीच मार्गावरील एका अपार्टमेंटवर धाड घातली व एक कॉम्प्युटर जप्त केला. याच कॉम्प्युटरमधून हा ई-मेल पाठविण्यात आला होता.
""आम्ही गुनिया बिल्डींगमधील एका निवासस्थानावर धाड घातली. आम्ही ज्या व्यक्तीकडे धाड घातली त्याची वैयक्तिक चौकशी करीत आहोत. या धाडीत एक कॉम्प्युटर देखील जप्त केलेला आहे. देशात आणखी घातपाती कारवाया करण्याची धमकी देणारा ई-मेल याच कॉम्प्युटरमधून पाठविण्यात आला होता. खरेच हा ई-मेल या कॉम्प्युटरमधून पाठविला गेला काय की अतिरेक्यांनी तसे भासविले, याची शहानिशा केली जात आहे,''अशी माहिती एटीएसच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा