विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय : दुर्गादास कामत
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): 'सायबरएज' योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना उशिरा का होईना, पण अखेर न्याय मिळाला आहे. या योजनेअंतर्गत संगणकापासून वंचित राहिलेल्या सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांना उद्या २९ जुलै पासून संगणक वितरणाचे काम सुरू होणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांना "विप्रो- पी ४' या नव्या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त संगणकांचे वितरण होणार असून उच्च शिक्षण खात्याचे संचालक भास्कर नायक यांनी त्यासाठी खास प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली.
सायबरएज योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या संगणकांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी सक्रियपणे काम केलेल्या अखिल गोवा विद्यार्थी मंचचे निमंत्रक दुर्गादास कामत यांनी ही माहिती दिली. या संघटनेचे अलीकडेच भारतीय जनता पक्ष विद्यार्थी विभागात विलीनीकरण करण्यात आले. मंचचे माजी निमंत्रक या नात्याने दुर्गादास कामत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात विद्यार्थ्यांनी दिलेला लढा व या मागणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर फळास आल्याचे म्हटले आहे. पणजी शहरात मोर्चा काढून आपल्या युवा शक्तीचे दर्शन घडवलेल्या व सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर पोलिसांचाही छळ सहन केलेल्या विद्यार्थ्यांना या मागणीची पूर्तता झाल्याने समाधान लाभणार आहे; विद्यार्थ्यांनी यापुढेही अशीच एकजूट दाखवावी,असे आवाहन कामत यांनी केले आहे.
अलीकडेच उच्च शिक्षण संचालकांची भेट घेऊन २९ जुलैपर्यंत संगणक पुरवण्याची मुदत भाजप विद्यार्थी विभागाने केली होती. या यशात उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक यांचा वाटा महत्त्वाचा असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. नायक यांनी हा प्रस्ताव सरकारी दरबारी सादर करून त्याचा नियमित पाठपुरावा केला. त्यात सध्या प्रचलित असलेल्या नव्या तंत्रज्ञानाच्या पेंटीयम-४ चे संगणक मिळवण्यासाठी त्यांनी व्हीप्रो कंपनीकडे प्रयत्न केले व त्यात यश मिळवले. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने मनाशी निर्धार केला तर त्यांनी हाती घेतलेले काम निश्चितच पूर्ण होऊ शकते याचे दर्शन भास्कर नायक यांच्या या कामावरून सिद्ध झाल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
या संगणकांचे वितरण येत्या २५ दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. खात्याकडून विविध शिक्षण संस्थांच्या यादीनुसार त्यांच्याकडे हे संगणक पोहोचते केले जाणार आहेत. नंतर ते विद्यार्थ्यांना मिळतील. या योजनेसाठी पात्र व सदर ४ हजार विद्यार्थ्यांत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत आपल्या कॉलेज व्यवस्थापनाकडे संपर्क साधावा,असे आवाहन कामत यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा