'संपुआ' सरकार मांडणार विश्वासदर्शक ठराव
नवी दिल्ली, दि.११ : डाव्यांनी पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात आलेल्या केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन येत्या २१ जुलैपासून बोलावण्यात येणार आहे. संपुआ समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
२१ जुलै रोजी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असून, याच दिवशी डॉ. मनमोहनसिंग आपल्या सरकारवरील एक ओळीचा विश्वासदर्शक ठराव सभागृहात सादर करणार आहे. या ठरावावर दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी मतदान घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काल राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली होती आणि शक्य तितक्या लवकर आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्याची इच्छा व्यक्त करणारे पत्र त्यांना दिले होते.
सोनियांचे डाव्यांना धन्यवाद
गेली साडेचार वर्षे संयुक्त पुरोगामी आघाडीला साथ देणाऱ्या डाव्या पक्षांचे कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आभार मानले. डाव्यांच्या विरोधात एकही अपशब्द न काढता त्या म्हणाल्या, ""डाव्यांच्या पाठिंब्याशिवाय संयुक्त पुरोगामी आघाडी अस्तित्वात येणे अशक्य होते. शिवाय, या साडेचार वर्षांच्या काळात सरकारने जी काही चांगली कामे केली ती देखील झाली नसती.''
संपुआच्या समन्वय समितीच्या बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधी यांनी सरकार बहुमतात असल्याचा आणि विद्यमान राजकीय संकट लवकरच निवळण्याचा विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सरकार आपले बहुमत सिद्ध करेल, असे त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केले.
डाव्यांनी आम्हाला दिलेली साथ कधीच विसरू शकत नाही. अणुकरार करण्याच्या प्रक्रियेतही डावे सोबत असावे अशी आमची मनापासून इच्छा होती. यासाठी आम्ही आवश्यक ते सर्वच प्रयत्न केले. पण, दुर्दैवाने डावे आज आमच्यासोबत नाहीत. त्यांनी पाठिंबा काढला याचे दु:ख आम्हाला आहेच. तथापि, देशहितासाठी पुढील वाटचाल आम्हाला करावीच लागणार आहे आणि तेच आम्ही करीत आहोत.''
यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीचेही विशेष आभार मानले. ऐन संकटाच्या वेळी सपाने आम्हाला पाठिंबा दिला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान डॉ. सिंग यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत गृहमंत्री शिवराज पाटील, परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी, संरक्षण मंत्री ए. के. अँटनी, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे नेते टी. आर. बालू आणि पीडीपीच्या खासदार मेहबूबा मुफ्ती आदी उपस्थित होते.
संसदेचा विश्वास संपादन केल्याशिवाय सरकार अणुकराराच्या दिशेने एकही पाऊल उचलणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी नुकतीच दिली होती. संपूर्ण संयुक्त पुरोगामी आघाडी यात त्यांच्या पाठिशी आहे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.
विश्वास मताचा सामना करण्यासाठी संपुआतील प्रत्येकच घटक पक्ष सज्ज आहे, असे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. तर, अणुकराराच्या मुद्यावरून संपुआत कुठलेही मतभेद नसल्याचे लालूप्रसाद यादव म्हणाले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा