नवी दिल्ली, दि. २८ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणुकीच्या प्रचारात भाजपने आघाडी घेतल्यानंतर धास्तावलेल्या कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही आज आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. देशातील सर्वच राज्यांमध्ये पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आणि रणनीती तयार करण्याचे निर्देश त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दिले आहेत.
काल भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्रातील कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारवर प्रखर प्रहार करीत कानपूर येथे पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला होता. त्याच्या दोन दिवस आधीच पक्षाने अडवाणी यांच्यासह सहा उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली होती. यामुळे कॉंगे्रस पक्षात कमालीची अस्वस्थतता निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने आज त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसांना आणि प्रदेशाध्यक्षांना भेटीला बोलावले. याच वर्षी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच स्तरांवर, प्रत्येक ठिकाणी पक्षाला नवजीवन देण्याची जबाबदारी सोनियांनी सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांवर सोपविली.
निवडणुकीत कॉंगे्रसचे धोरण आणि कार्यक्रम कोणते राहायला हवेत याबाबतची योजना प्रत्येकालाच तयार करायची आहे. यासाठी प्रत्येकाने आतापासूनच तयारीला लागायला हवे. पुढील बैठकीत प्रत्येकांनी आपल्या योजना माझ्याकडे सादर करायच्या आहेत, असे सोनिया गांधी यांनी सांगितले असल्याचे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. देशपातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी सोनिया गांधी यांनी उपस्थित प्रत्येक नेत्याला वेळापत्रकच दिले आहे.
पक्षाने वरिष्ठ नेत्यांकडे जे कार्यक्रम सोपविले होते त्यांची अंमलबजावणी कुठपर्यंत आली याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. तथापि, लोकसभेची निवडणूक ठरल्याप्रमाणे पुढील वर्षीच होणार की, मध्यावधी घेण्यात येईल या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही.
विशेष म्हणजे, सरकारला अडचणीत आणण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अणुकरारावर सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. पक्ष कार्यकारिणीच्या दोन बैठकांमध्ये या मुद्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. शिवाय, आजची ही बैठक निवडणुकीकरिता पक्षाला तयार करणारी होती, असे एका नेत्याने सांगितले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा