Saturday, 21 June 2008

कूळ-मुंडकारांना न्याय कधी मिळेल?

आमदार दयानंद सोपटेंची विचारणा
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) : राज्यातील कूळ-मुंडकार प्रकरणे दिवसेंदिवस तुंबत चालली असून याकामासाठी खास उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करूनही लोकांना अद्याप न्याय मिळत नाही. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार व्हावा,अशी मागणी पेडणेचे आमदार दयानंद सोपटे यांनी अस्थायी समितीसमोर ठेवली.
आज पर्वरी सचिवालयात महसूल खात्याच्या अस्थायी समितीची बैठक आमदार आग्नेलो फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीचे सदस्य या नात्याने आमदार सोपटे यांनी हा विषय संबंधित अधिकाऱ्यांसमोर ठेवला. यावेळी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक,दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी जे. पी. नाईक, महसूल खात्याचे सचिव आर. पी. पाल हजर होते. विविध तालुक्यात कुळ-मुंडकार प्रकरणे हातावेगळी करण्यासाठी सरकारने अद्याप काहीच ठोस उपाययोजना केली नसल्याचे सोपटे यांनी स्पष्ट केले. काही तालुक्यात सनद मिळवण्यासाठी पैसे भरूनही आठ ते दहा वर्षे झाली तरी अद्याप लोकांना ताटकळत ठेवले जात असल्याची तक्रार करून सोपटे यांनी काही नावेही संबंधित अधिकाऱ्यांसमोर ठेवली. दरम्यान, विविध मामलेदार व जिल्हाधिकारी कार्यालयांत प्रशासकीय कामाचा बोजा वाढल्याने तसेच संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्रे व इतर दाखले देण्याची कामे करावी लागत असल्याने अशा कामांवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे यावेळी मान्य करण्यात आले. निवडणूक मतदारयाद्या तयार करण्याचे कामही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येत असल्याचा त्याचा परिणाम जनतेच्या कामांवर होत असल्याची माहितीही देण्यात आली.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा