मडगाव, दि. 15 (प्रतिनिधी) - पेट्रोलियम पदार्थांच्या दरांमध्ये भरमसाठ झालेल्या वाढीच्या अनुषंगाने सरकारने बस तिकीट दरात किमान 25 टक्के वाढ द्यावी, अशी मागणी अखिल गोवा बसमालक संघटनेच्या कार्यकारिणीच्या आज येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पाजीफोंड येथील भंडारी भवनात झाली व तिला कार्यकारिणीचे सर्व सदस्य हजर होते. सरकारने निःसंकोच मनाने ही मागणी मान्य करायला हवी कारण यापूर्वी दिलेल्या तिकीट दरवाढीनंतर डिझेलचे दर कितीतरी वाढले आहेत व आता झालेली वाढ तर कल्पनेपलीकडील आहे असे बैठकीत प्रतिपादण्यात आले.
बसमालकांनी केलेली मागणी अवास्तव वाटत असेल तर सरकारने यापूर्वी स्थापन केलेल्या व्यापारी वाहनांच्या समितीची बैठक बोलवावी व तिचा सल्ला घेऊन आजच्या बाजारभावाप्रमाणे दरवाढ निश्र्चित करावी असेही सुचविण्यात आले.या समितीत बसमालकांच्या प्रतिनिधींबरोबरच टॅक्सीवाले, ऑटोरिक्षावाले सारख्या प्रवासी वाहन चालकांचा समावेश आहे.
सरकारने या प्रश्र्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक प्रवासी सेवा हा या व्यवसायाला उद्योग म्हणून मान्यता द्यावी, त्याला डिझेल व आवस्यक त्या वस्तू व सुटे भाग सवलतीच्या दराने पुरवावेत अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.त्याशिवाय बसमालकांना ही लोकसेवा चालू ठेवता येणे शक्य होणार नाही हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दरम्यान, आज बसमालक संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीतील एकंदर सूर पहाता संपूर्ण कार्यकारिणी लवकरच राजीनामा देण्याचे संकेत मिळाले. अध्यक्ष रजनीकांत नाईक यांना त्याबाबत विचारता त्यांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला पण अधिक काही सांगण्याचे टाळले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा