गेले डॉक्टर कुणीकडे..?
तुये इस्पितळासाठी दोन कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते आजपर्यंत या इस्पितळाकडे कधी फिरकलेच नाहीत. तसेच सात वर्षांपूर्वी फिजिशियनची नियुक्ती झाली होती. सात वर्षांत त्यांनासुद्धा या इस्पितळाची आठवण आली नाही.
निवृत्ती शिरोडकर
मोरजी, दि. २६ : पेडण्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी उभारण्यात आलेले तुये इस्पितळ स्वतःच्या आरोग्याची काळजी वाहण्यात अपयशीच ठरले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, कर्मचाऱ्यांची कमतरता, इमारतीची झालेली दयनीय अवस्था, रुग्णवाहिकेची, जीपची कमतरता, भूतबंगला वाटावते असे निवासी गाळे व खराब रस्ते यांसारख्या समस्यांनी हे इस्पितळ जर्जर झाले आहे. त्यामुळे या "शासकीय उपेक्षित' भागातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आजपर्यंतचा पेडणेचा इतिहास पाहिल्यास या तालुक्याकडे शासनाचे दुर्लक्षच झाले आहे. याला तुये इस्पितळच अपवाद असण्याचे कारणच नाही. या इस्पितळाची स्थितीही सरकारप्रमाणेच बेभरवशी झाली आहे. इस्पितळात नेमके कधी डॉक्टर्स उपलब्ध असतील, याबाबत नागरिक सोडाच तर खुद्द काही कर्मचारीही अनभिज्ञ असतात.
गेल्या कित्येक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची इस्पितळाला सातत्याने कमतरता जाणवत आहे. आला दिवस पुढे ढकलायचा हेच सरकारी धोरण असून रिक्त जागा भरण्याबाबत प्रशासनच गंभीर नाही. याचा फटका लोक सोसत आहेत.. इस्पितळात दाखल केलेल्या रुग्णाला "आगे बढो..' या उक्तीनुसार बांबोळी, म्हापसा येथे पाठवण्यात येते. यामुळे नागरिकही संताप व्यक्त करीत आहेत. इस्पितळाचे वैद्यकीय अधिकारी एस. रामास्वामी यांनी या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांनाही शरणागतीच पत्करावी लागली. त्यांची तेथून बदली करण्यात आली. ही त्यांची नववी बदली. यामुळे या इस्पितळात तात्काळ ज्येष्ठ शल्यविशारद, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ आदींची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची गरज आहे.
या इस्पितळात तालुक्यातील गरोदर महिलांना दर गुरुवारी तपासण्यात येते. त्याबाबतही अनेक महिलाअनिभिज्ञ आहेत. तुये इस्पितळासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या तो अधिकारी पणजी येथील अर्बन सेंटरमध्ये काम करत आहे. आश्चर्य, म्हणजे हा अधिकारी पणजीत काम करत असला तरी वेतन मात्र हक्काने तुये इस्पितळातून घेतो.
या इस्पितळात तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी दर सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते ४.५० वाजेपर्यंत तर शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी केली जाते. तथापि, या वेळेत आलेल्या रुग्णांना डॉक्टर्सच्या गैरहजेरीमुळे आल्या पावली माघारी फिरावे लागते.
पेडणे तालुक्यातील जनतेला आरोग्याचे आशास्थान असलेल्या या इस्पितळाची इमारत म्हणजे कर्मचारी आणि रुग्णांसाठी टांगती तलवारच म्हणावी लागेल. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत दुरुस्ती व निगा विभागाने याकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही. कदाचित, त्यांना तशी आवश्यकताही भासली नसेल. एखादा अपघात घडल्यानंतरच निद्रिस्त शासनाला जाग येईल.
इस्पितळाला रुग्णवाहिकेची नितांत गरज असूनही ती दिली जात नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीपाद नाईक व पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी भेट देऊन इस्पितळाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी श्रीपाद नाईक यांनी खासदार निधीतून इस्पितळाला रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तपासणीला जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना नवीन जीप गाडी देणे गरजेचे आहे. सध्याची जीप वारंवार नादुरुस्त होत असल्याने ते जोखमीचे ठरू शकते.
इस्पितळ परिसरात कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करण्यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च करून ८ निवासी गाळे बांधलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे बांधकाम पूर्ण न केल्यामुळे ते अद्याप इस्पितळाच्या ताब्यात आलेले नाहीत. परिणामी हे गाळे वापराविनाच जमीनदोस्त होण्याची शक्यता दिसते.
या इस्पितळाच्या अडचणी, कर्मचारी, डॉक्टरांची उणीव यावर देखरेख देण्यासाठी तालुक्यातील समाज कार्यकर्त्यांची समिती निवडली जाते. देखरेख समितीच्या बैठकीत समस्या मांडल्या जातात. त्यावर तोडगाही काढला जातो. तथापि, आरोग्याधिकारी डॉ. रामास्वामी यांची तुये इस्पितळातून बदली झाल्यानंतर देखरेख समितीच्या सदस्यांची बैठकच पार पडलेली नाही.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा