आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
सरकारला घेरण्याची
विरोधी पक्षांची तयारी
नवी दिल्ली, दि. २४ - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असल्याने संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अणु करार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गहू घोटाळा आदी मुद्यांवर भाजपाने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला अडचणीत आणण्य़ाचा पवित्रा घेतल्याने उद्यापासून सुरू होणारे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे डावे पक्षही अणु करारावरून केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
सुमारे तीन महिने चालणाऱ्या संसदेच्य अर्थसंकल्पीय अधिवेशानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. येत्या २७ फेब्रुवारी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव हे रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २८ फेब्रुवारीला आर्थिक सर्वेक्षण पटलावर ठेवण्यात येईल तर २९ तारखेला वित्तमंत्री पी.चिदंम्बरम हे वित्तीय अंदाजपत्रक संसदेत सादर करतील.
अधिवेशनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संसद परिसरात अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून अधिवेशनाच्या काळात या परिसरात सर्व प्रकारचे धरणे, निदर्शने यावर बंदी घालण्यात आली आहे, असी माहिती दिल्ली पोलीस प्रवक्ते राजन भगत यांनी दिली.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त पोलीस तैनात करण्याबरोबरच महत्वाच्या ठिकाणी मेटल डिटेक्टर्स लावण्यात आले आहेत. याशिवाय़ संसदेत येणाऱ्या व्यक्तींची कसून तपासणीही करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा