विवाह नोंदणी रद्द पण
वास्तव्य दाखला चौकशी चालूच
मान्यता -संजय दत्त विवाह
मडगाव, दि.२८ (प्रतिनिधी) - गेला महिनाभर गाजत असलेल्या अभिनेता संजय दत्त व मान्यता यांच्या गोव्यात झालेल्या विवाह नोंदणीवर काल उभयतांनी येथील नागरी नोंदणी उपप्रबंधकांकडे आपल्या वकिलांमार्फत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे पडदा पडलेला असला तरी सदर विवाह नोंदणीसाठी आवश्यक असलेला वास्तव्य दाखला मिळविण्यासाठी मान्यताने जे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते ते प्रकरण मात्र त्यांचा ससेमिरा एवढ्यात सोडेल असे दिसत नाही.
संजय दत्त व मान्यता यांच्यावतीने काल सदर कार्यालय बंद होण्याच्या सुमारास ऍड. मनोज देसाई यांनी नोंदणी उपप्रबंधक श्री. पिसुर्लेकर यांच्याकडे अर्ज सादर केले . त्यात म्हटले आहे की गोव्यात अस्तित्वात असलेल्या पोर्तुगीज विवाहनोंदणी कायद्याखाली विवाहनोंदणी झालेली त्यांना नको आहे व म्हणून ती रद्द करावी. पिसुर्लेकर यांनी सदर अर्ज व प्रतिज्ञापत्रे आपणाकडे आल्याचे व आपण ती वरिष्ठाना सादर केल्याचे मान्य केले.
मडगाव विवाह नोंदणी विभागाचे प्रमुख श्री. बोडके यांनी हे प्रकरण कायदा खात्याकडे अभ्यासार्थ गेलेले असल्याने आपण कालची कागदपत्रे कायदा विभागाच्या हवाली केल्याचे सांगितले. ते म्हणाले की आपण त्या प्रकरणी काहीच निर्णय घेऊ शकत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार संजय मान्यता यांनी एवढा खटाटोप करण्याची काहीच गरज नव्हती. ९० दिवसांपर्यंत येऊन दुसऱ्यांदा नोंदणीवर स्वाक्षरी केली नाही की पूर्वींची नोंदणी आपोआप रद्द होत असते . ते माहित नसल्याने त्यांनी कदाचित हा मार्ग पत्करला असावा असे मानले जाते.
दुसरीकडे वास्तव्य दाखल्यासाठी मान्यताने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात येत्या ७ मार्च रोजी तिला सासष्टीचे मामलेदार परेश फळदेसाई यांच्या समोर हजर व्हावेच लागणार आहे. ही दोन्ही वेगवेगळी प्रकरणे असून यावेळी ती हजर रहाते की गेल्या खेपेप्रमाणे वेगळे धोरण स्वीकारते ते पहावे लागणार आहे.मात्र एवढ्या साऱ्या रामायणानंतरही त्यांनी गोव्यात येऊन विवाहनोंदणीचा खटाटोप का केला हा प्रश्र्न मात्र उरतोच.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा