मंत्रिमंडळ बदल व खातेवाटपाचा
अधिकार समन्वय समितीलाः मुख्यमंत्री
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)- कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत विद्यमान मंत्रिमंडळातील एकाही कॉंग्रेस नेत्याचे मंत्रिपद जाणार नाही, असे ठरवण्यात आले असले तरी याबाबत ठामपणे सांगण्याचे धाडस मात्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना झाले नाही.
मंत्रिमंडळ व खातेवाटपातील बदल याचा पूर्ण अधिकार केंद्रीय समन्वय समितीला देण्यात आला आहे. ही समिती जो निर्णय घेईल तो मान्य करणे क्रमप्राप्त ठरणार असल्याने विधिमंडळ बैठकीत व्यक्त झालेल्या भावना या कॉंग्रेस आमदारांचे वैयक्तिक मत असल्याचे संकेत त्यांनी दिले. विधिमंडळ बैठकीत काल झालेल्या चर्चेबाबत तसेच विविध आमदारांनी व्यक्त केलेल्या भावना दिल्लीत श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी, मगोप व विश्वजित राणे यांच्या आघाडीबाबत केलेल्या विधानाबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगून ही आघाडी कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहे, हे महत्त्वाचे असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, रविवारी केंद्रीय नेते गोव्यात येण्याची शक्यता आहे. हे नेते गोव्यात आल्यानंतर आघाडीचे सर्व घटक एकत्र बसून दिल्लीत झालेल्या "फॉर्म्युला" ची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा