Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 July, 2011

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अवधूत तिंबलोंवर नोंदवा

कुड्डेगाळ खाण अपघात प्रकरणी
सीआयडी, दक्षता विभागाकडे तक्रार

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): कुड्डेगाळ - फोमेंतो खाणीवर घडलेल्या अपघातात तिघांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा दावा करून फोमेंतो कंपनीचे अध्यक्ष अवधूत तिंबलो यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा अन्वेषण विभाग व दक्षता विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. श्री. तिंबलो यांच्यासह तांत्रिक विभागाचे संचालक प्रशांत सरदेसाई, फोमेंतो खाण विभागाचे मुख्य अधीक्षक वाय. एस. रेड्डी आणि प्रकल्प पद्धतीचे उपाध्यक्ष सुनील यादव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा व हलगर्जीपणाचा गुन्हा नोंद करण्याची विनंती या तक्रारीत करण्यात आली आहे.
दि. १७ जून रोजी कुड्डेगाळ येथे फोमेंतो खाणीवरील टेलिंग पॉइंट कोसळून घडलेल्या अपघातात किमान दहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करून याची सखोल चौकशी व्हावी, असे या तक्रारीत म्हटले गेले आहे. सदर तक्रार माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेटये, ऍड. आतीश मांद्रेकर व डॉ. केतन गोवेकर यांनी केली आहे. हा अपघात म्हणजे सर्वस्वी कंपनीच्या अभियांत्रिकी विभागाचा हलगर्जीपणा आहे. तरीही पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंद करून घेतली नसल्याने सदर विभागातील निरीक्षक, उपअधीक्षकांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंद केला जावा, असेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
२००६ साली या कंपनीच्या खाणीवर मातीचा ढिगारा कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संचालकांवर आणि अन्य अधिकार्‍यांवर भा. दं. सं ३०४(अ) कलमानुसार गुन्हा नोंद करून घेतला होता, याचीही माहिती त्यांनी पुढे नमूद केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची त्वरित तक्रार नोंद करून जबाबदार असलेल्यांवर गुन्हा नोंद केला जावा. अन्यथा, याविरोधात न्यायालयातही धाव घेतली जाणार असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे. अद्याप पोलिसांनी या तक्रारीची नोंद करून घेतलेली नाही.

No comments: