वालावलकर उच्च माध्यमिकच्या
६०० विद्यार्थ्यांची उग्र निदर्शने
म्हापसा दि. १५ (प्रतिनिधी): दिगंबर कामत सरकारने माध्यमप्रश्नी घेतलेल्या घातकी निर्णयामुळे उठलेले संतापाचे लोण आता विद्यार्थिवर्गातही अतिशय झपाट्याने पसरत चालले आहेत. काल खांडोळा व केपे येथील शासकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ‘काळा दिवस’ पाळून कामत सरकारचा निषेध नोंदवण्याच्या घटनेला चोवीस तासही उलटले नाहीत तोच आज म्हापसा येथील पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुमारे सहाशे विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढत सारस्वत कॉलेजच्या मैदानावर सरकारी परिपत्रकाची होळी केली. जोरदार घोषणाबाजी करून यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
या विद्यार्थ्यांचे नेतृत्व भारतीय भाषा सुरक्षा मंचचे युवा कार्यकर्ते तुषार टोपले व राजदीप नाईक यांनी केले. मातृभाषांच्या संरक्षणासाठी शेकडोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मातृभाषा व गोमंतकीय संस्कृतीचा जयजयकार करत युवाशक्ती प्रकट झाल्याचे चित्र यावेळी दिसले.
पोर्तुगिजांचे भूत चर्चिलच्या मानगुटीवर नाचत आहे आणि मुख्यमंत्री कामत त्यांच्या दबावापुढे झुकून गोव्याची संस्कृती नष्ट करण्यासाठी निघाले आहेत. या भुतांना बाटलीत बंद करण्यासाठी आता युवकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राजदीप नाईक यांनी यावेळी केले. युवा शक्तीपुढे मोठमोठे सत्ताधीश नतमस्तक झाले आहेत. आपली अस्मिताच नष्ट करण्यासाठी निघालेल्या कॉंग्रेस सरकारला गाडून टाकण्यासाठी याच युवा शक्तीचा आविष्कार होणे ही काळाची गरज आहे, असे उद्गार यावेळी तुषार टोपले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना काढले.
Saturday 16 July, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment