सरकारचा आदेश - खाणग्रस्तांना दिलासा
डिचोली, दि. २३ (प्रतिनिधी): जनतेच्या जिवावर उठलेल्या डिचोली व मुळगाव येथील खाणी बंद ठेवण्याचा आदेश सरकारने काढल्यामुळे या भागातील सामान्य जनतेला निदान काही काळ तरी दिलासा मिळणार आहे. खाणींवरील घरघर थांबणार असल्याने लोक सुखावले असून त्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आवश्यक अटींची पूर्तता न केल्यामुळे पुढील कार्यवाही होईपर्यंत या खाणी बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. खनिज उत्खनन पूर्णपणे थांबवण्यात यावे आणि केवळ दुरुस्ती तथा डागडुजीचे काम सुरू ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे. यातील वेदांतच्या खाणीचा खंदक १६ जुलै रोजी फुटून मुळगाव परिसरात हाहाकार माजला होता. त्यामुळे आलेल्या पाण्याच्या लोटात तिघेजण वाहून गेले आणि सुदैवानेच ते बचावले होते. तेव्हापासून
या परिसरातील वातावरण पुन्हा तापत चालले आहे. तसेच शेतीचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान त्या दुर्घटनेमुळे झाले असून याबाबत त्वरित भरपाई मिळावी, अशी लोकांनी जोरदार मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी आज मुळगावात
दरम्यान, जिल्हाधिकारी मिहीर वर्धन उद्या रविवारी मुळगावला भेट देणार असून ते या खाणींच्या विषयांचा समग्र आढावा घेतील. तसेच घटनास्थळाला ते प्रत्यक्ष भेटही देणार आहेत.
Sunday 24 July, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment