Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 July, 2011

भीषण बॉंबस्फोटांनी मुंबई हादरली

२० ठार, ११३ जखमी; दहा मिनिटांत तीन धमाके
* दादरला डिसिल्वा हायस्कूलनजीक स्ङ्गोट
* झवेरी बाजारात छत्रीमध्ये धमाका
* ऑपेरा हाऊसपाशी तिसरा बॉम्बस्ङ्गोट

मुंबई, दि. १३ : देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणार्‍या मुंबईमध्ये आज सायंकाळी लागोपाठ तीन ठिकाणी बॉम्बस्ङ्गोट झाल्याने हे महानगर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांनी हादरले. दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी ‘आयईडी’च्या मदतीने घडवण्यात आलेल्या या स्ङ्गोटांत २० लोक ठार तर ११३ लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या स्ङ्गोटांनंतर मुंबई आणि दिल्लीसह देशातील चौदा प्रमुख शहरांत गृहखात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये आणि निष्कारण गोंधळ उडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने केले आहे.
संध्याकाळी ६.५० ते ७ वाजण्याच्या दरम्यान दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी ‘आयईडी’ (इंप्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस) म्हणजेच रोडसाइड बॉंबच्या मदतीने हे स्ङ्गोट घडवण्यात आले. ही माहिती गृहखात्याने दिली. हे स्ङ्गोट म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ला असल्याची कबुलीदेखील गृहखात्याने दिली आहे. दहशतवादी प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणांना आपले लक्ष्य करतात ही बाब या हल्ल्यांद्वारे पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.
पहिलाच स्फोट जबरदस्त
दादर येथील डिसिल्व्हा हायस्कूल आणि गोल हनुमान मंदिराजवळील बेस्ट बस स्टॉपच्या मीटरबॉक्समध्ये संध्याकाळी पावणे सात वाजता बॉम्बस्ङ्गोट झाला. हा स्ङ्गोट एवढा जबरदस्त होता की, बाजूने रस्त्यावरून चाललेल्या एस्टीम (एमएच ४३ ए ९३८४) कारचा चक्काचूर झाला. दादरचा हा परिसर संध्याकाळी प्रचंड गजबजलेला असतो. या स्ङ्गोटात किमान तीन ते चार लोक जखमी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. जखमींना केईएम इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटानंतर धास्तावलेले लोक जीव घेऊन सैरावैरा धावत सुटले. नेमके काय घडतेय हेच त्यांना कळेनासे झाले होते.
दुसरा स्फोट खाऊ गल्लीत
त्यानंतर, झवेरी बाजार येथील खाऊ गल्लीतही संध्याकाळी सातच्या सुमारास मोठा स्ङ्गोट झाला. येथे एका छत्रीमध्ये बॉंब लपवून ठेवण्यात आला होता. संध्याकाळी तेथे ‘पोटपूजा’ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या ठिकाणच्या स्ङ्गोटात किमान ५ जण ठार झाल्याचे समजते. स्ङ्गोटातील जखमींना जीटी आणि जेजे इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी हातगाड्या, टेंपोे, स्कूटर अशा मिळेल त्या वाहनांनी जखमींना इस्पितळांत पोहोचवले. आज पाऊस असल्याने खाऊ गल्लीत तुलनेने कमी गर्दी होती. अन्यथा आणखी जास्त प्राणहानी व वित्तहानी झाली असती, अशी माहिती खाऊ गल्लीतील नागरिकांनी दिली.
तिसरा स्फोट ऑपेरा हाऊस भागात
हिरे व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या ऑपेरा हाऊस येथील प्रसाद चेंबर इमारतीजवळील बस थांब्यापाशी तिसरा बॉम्बस्ङ्गोट झाला. या स्ङ्गोटात रस्त्यावरील पांढर्‍या मारुती वॅगन आर कारचे जबर नुकसान झाले, तसेच अन्य वाहनांचाही चुराडा झाला. तेथे १० ते १५ जखमींना नजीकच्या हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जणांना हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच मृत्यू आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपत्कालीन बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
वाहिन्यांचा अतिउत्साह; हतबल पोलिस
यापूर्वी जेव्हा मुंबईवर २६-११ रोजी भयंकर हल्ले झाले होते तेव्हा प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांच्या पत्रकारांनी नको तेवढा उतावीळपणा केला होता. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांच्यावरच टीकेेचे आसूड ओढण्यात आले होते. मात्र, काल बुधवारी पुन्हा अशाच अतिउत्साहाचे प्रत्यंतर या मंडळींकडून आले. स्फोट नुकतेच झाले असल्याने आपण नियंत्रण कक्षाकडून माहिती येण्याच्या प्रतीक्षेत आहोत, असे मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकारी सातत्याने सांगत होते. तरीसुद्धा त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करून त्यांच्याकडून ‘बाईट’ मिळवण्याची शर्यतच सुरू असल्याचे ओंगळवाणे चित्र या निमित्ताने दिसून आले.
----------------------------------------------------------------------
स्फोटांमागे ‘इंडियन मुजाहिद्दीन’?
प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, या स्फोटांमागे ‘इंडियन मुजाहिद्दीन’ व ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे विविध टीव्ही वाहिन्यांवरून सांगितले जात होते. मात्र, मुंबई पोलिसांनी पूर्ण तपासाअंतीच यासंदर्भात ठोस विधान करता येईल, असे स्पष्ट केले. यापूर्वी मुंबईत ११ जुलै २००६ रोजी असेच भयंकर स्फोट घडवून आणण्यात आले होते. त्यात २०९ जण ठार, तर ७०० जण जखमी झाले होते. त्यासाठी प्रेशर कुकरमध्ये आरडीएक्स व अमोनियम नायट्रेट यांचा वापर करण्यात आला होता.
---------------------------------------------------------------------
हा दहशतवादी हल्लाच : गृहखाते
‘आयईडी’च्या साहाय्याने घडवण्यात आलेले हे स्ङ्गोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याची कबुली गृहखात्याने दिली आहे. या स्ङ्गोटांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ‘एनएसजी’ (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) कमांडो तसेच ‘एनआयए’ची टीम (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) राष्ट्रीय तपास यंत्रणा तातडीने मुंबईला रवाना करण्यात आली आहे.
----------------------------------------------------------------------
गोव्यातही हाय अलर्ट
मुंबईवर बुधवारी संध्याकाळी पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातही अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. गोव्यातील सर्व प्रमुख शहरांत रात्रीची नाकाबंदी करण्यात आली होती.

No comments: