Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 13 July, 2011

सात गेले, आठ आले

गुरुदास कामत, विरप्पा मोईलींची उघड नाराजी
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
- रमेश यांचे पर्यावरण खाते काढले
- तृणमूलचे दिनेश त्रिवेदी रेल्वेमंत्री
- सलमान खुर्शिद कायदा मंत्रालयात

नवी दिल्ली, १२ जुलै : पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा व्यापक स्तरावर विस्तार करताना सात मंत्र्यांना घरी बसविले आणि आठ नव्या मंत्र्यांचा समावेश केला. सोबतच त्यांनी तीन राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देऊन अनेकांच्या खात्यांमध्येही ङ्गेरबदल केले. दरम्यान, या खांदेपालटानंतर पंख छाटण्यात आलेल्या गुरुदास कामत आणि विरप्पा मोईली यांनी कॉंग्रेसविरोधात उघड बंड पुकारण्याचे संकेत दिले आहेत.
आज मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती भवनातील एका समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आजच्या विस्तारामुळे डॉ. सिंग यांच्या मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ६८ च्या घरात गेली आहे.
आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेपालट करताना पंतप्रधान डॉ. सिंग यांनी अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार या चार महत्त्वाच्या खात्यांना स्पर्शही केला नाही. ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले रेल्वे मंत्रालय पंतप्रधानांनी तृणमूल कॉंगे्रसचे आत्तापर्यंत राज्यमंत्री असलेले दिनेश त्रिवेदी यांना कॅबिनेटचा दर्जा देत त्यांच्याकडे सोपविले; तर पर्यावरण आणि वन मंत्रालयाला नवा चेहरा देणारे जयराम रमेश यांच्याकडून हे मंत्रालय काढून घेण्यात आले. याशिवाय, एम. वीरप्पा मोईली यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून त्यांना प्रमंडळ व्यवहार खात्यात पाठविले आणि सलमान खुर्शिद यांना कायदा मंत्रालयात आणले. पोलाद खात्याचे राज्यमंत्री म्हणून आत्तापर्यंत स्वतंत्र पदभार सांभाळत आलेले बेनीप्रसाद वर्मा यांना बढती देऊन त्यांना त्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले आहे. गेल्या १८ वर्षांपासून मंत्री बनण्याचे स्वप्न पाहत आलेल्या कॉंगे्रसच्या प्रवक्त्या जयंती नटराजन यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना त्यांच्याकडे पर्यावरण आणि वन मंत्रालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर, गेल्या २० वर्षांपासून मंत्रिमंडळाबाहेर राहिलेले आसामच्या दिबु्रगडचे खासदार पबनसिंग घाटोवार यांना ईशान्य प्रदेश विकास खात्याचे मंत्री बनविण्यात आले आहे. या दोन नव्या चेहर्‍यांशिवाय तृणमूलचे नेते सुदीप बंदोपाध्याय (आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री), जितेंद्र सिंग (गृह राज्यमंत्री), मिलिंद देवरा (दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री), राजीव शुक्ला (संसदीय कामकाज राज्यमंत्री), चरणदास महंत (कृषी व अन्न प्रक्रिया राज्यमंत्री) आणि व्ही. किशोर चंद्र देव यांचा समावेश आहे.
ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे त्यात, एम. एस. गिल, बी. के. हांडिक, कांतिलाल भुरिया, मुरली देवरा, दयानिधी मारन, ए. साई प्रताप आणि अरुण यादव यांचा समावेश आहे.
गृह आणि दूरसंचार खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) असलेले गुरुदास कामत यांना नव्याने तयार करण्यात आलेल्या पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या खात्यात पाठविण्यात आले आहे. विलासराव देशमुख यांच्याकडून ग्रामीण विकास खाते काढून घेण्यात आले असून, त्यांच्याकडे आता विज्ञान, तंत्रज्ञान आणि भूविज्ञान खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री ई. अहमद यांना मनुष्यबळ विकास खात्यात पाठविण्यात आले आहे.
गुरूदास कामत यांचा
मंत्रिपदाचा राजीनामा

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी मोकळे होतात, तोच पक्षाचे मुंबईतील नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने गुरुदास कामत नाराज होते. ते शपथविधीस उपस्थित न राहिल्याची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेऊन त्यांना राजीनामा द्यायला लावल्याची दिल्लीत चर्चा सुरू आहे.

No comments: