Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 25 July, 2011

आता सरकारच्या तोंडाला काळे फासण्याची वेळ - पर्रीकर

भाषा सुरक्षा मंचाची वाळपईत प्रचंड सभा

वाळपई, दि. २४ (प्रतिनिधी)
गोव्यावर शेकडो वर्षे राज्य करूनही परकीयांना जे जमले नाही ते पाप स्वकीयांनीच केले आहे. त्यामुळे तेे आपल्या इंग्रजीकरणाच्या भूमिकेशी ठाम राहत गोमंतकीयांचा घात करू पाहत आहेत. अशा अराष्ट्रीय कृतीला वेळीच ठेचले पाहिजे अन्यथा आपला सांस्कृतिक ठेवाच नष्ट करण्यास कामत सरकार मागे पुढे पाहणार नाही. माध्यमप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमान बाळगत खुर्ची सोडायला हवी होती. त्यांनी हा निर्णय बदलल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ असे त्यांना सांगितले मात्र आता वेळ बरीच पुढे गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जनता आजवर काळे झेंडे दाखवायची पण आता यापुढे त्यांच्या तोंडाला काळेच फासण्याची वेळ आली आहे असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वाळपई येथे प्रतिपादन केले. भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे आज (दि.२४) वाळपई येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत श्री. पर्रीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली. अरविंद भाटीकर, मंचाचे सत्तरी तालुका अध्यक्ष रणजित राणे, साहित्यिक विष्णू सूर्या वाघ, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, सत्तरी जागरूक युवा मंचाचे अध्यक्ष विश्‍वेश परब, डॉ. प्रेमानंद दलाल, संतोष हळदणकर, पर्ये मंडळ अध्यक्ष महेश तांबट, ऍड. स्वाती केरकर, वाळपई मंडळ सरचिटणीस सखाराम गावकर, पाळी मंडळ अध्यक्ष विठोबा घाडी, भारत स्वाभिमानचे तुळशीदास काणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना साहित्यिक विष्णू वाघ म्हणाले की, प्राथमिक स्तरावर इंग्रजी ही विषासारखी असून कामत सरकारने गोव्यात प्राथमिक स्तरावर इंग्रजीला अनुदान घोषित करून एकप्रकारे विषाचीच परीक्षा घेतली आहे. हा तर आपली संस्कृती संपवण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. एकदा इंग्रजीला स्थान मिळाले की, आपले सांस्कृतिक व्यवहारही बदलतील. असे झाल्यास आपला विनाश हा ठरलेलाच आहे. त्यामुळे आपल्या मायभूमीशी प्रतारणा करणार्‍याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे श्री. वाघ यांनी पुढे सांगितले.
श्रीमती काकोडकर यांनी बोलताना, सत्तरीतील सत्तेवर असलेल्या नेत्यांनी पैशांच्या बळावर जनतेला लाचार बनवण्याचे थांबवावे अन्यथा हीच जनता स्वाभिमान जागा झाल्यावर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. सत्तरीतून कोणत्याही दबावाला बळी न पडता लोकांनी पुढे यावे. कारण भाषा हा प्रश्‍न केवळ मर्यादित लोकांपुरताच नसून प्रत्येकाची सांस्कृतिक नाळ मातृभूमीशी जोडलेली आहे असे त्या पुढे म्हणाल्या.
श्री. करमली यांनी यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या वर्षातच कामत सरकारने हा संस्कृतीचा गळा घोटणारा निर्णय घेत जनतेला एक अभद्र भेट दिली आहे अशी खरमरीत टीका केली. आत्मविकासासाठी मातृभाषेतून शिक्षण आवश्यक असून प्राथमिक स्तरावर इंग्रजीला भारतीय घटनेत स्थानच नाही. असे प्रतिपादन केले. श्री. भाटीकर यांनी यावेळी जनतेला स्वाभिमानाने जगणे शिकवण्यासाठी गावोगावी शाळा उघडल्या. मात्र कामत सरकार समाजाला लाचार बनवण्यासाठी इंग्रजीकरण करत आहे असे सांगितले.
यावेळी हनुमंत परब, देमू गावकर, डॉ. प्रमोद सावंत, नरहरी हळदणकर, विश्‍वेश परब, गोविंद कोरगावकर यांनी आपले विचार मांडले.
आजच्या या सभेला प्रचंड प्रमाणात भाषाप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. त्यामुळे इंग्रजीकरणाचा वणवा सत्तरीतही पेटला असल्याचे दिसून आले. या सभेस भाषाप्रेमी, पालकवर्ग, विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रणजित राणे यांनी केले. तुळशीदास काणेकर यांनी आभार मानले. ऍड. शिवाजी देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

No comments: