Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 July, 2011

लोकपाल विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पावसाळी अधिवेशनात संसदेत सादर होणार
नवी दिल्ली, दि. २८ : सरकारी लोकपाल विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. पंतप्रधान, उच्च न्यायव्यवस्था आणि संसदेतील खासदारांची वागणूक या तीन महत्त्वाच्या बाबी लोकपालच्या कक्षेपासून दूर ठेवणारे हे विधेयक संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारचे लोकपाल विधेयक म्हणजे, देशाची निव्वळ ङ्गसवणूक असल्याचा आरोप करतानाच, १६ ऑगस्टपासून आपण बेमुदत उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले.
अण्णा हजारे यांच्या चमूने सुचविलेल्या काही सूचना या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कोणत्याही केंद्रीय मंत्र्याची, प्रथम श्रेणीच्या किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकार्‍याची चौकशी सरकारच्या मंजुरीशिवाय करण्याचे अधिकार लोकपालला देण्याची महत्त्वाची सूचना अण्णांच्या चमूने केली होती. ती सरकारने मान्य केली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेत झालेल्या केंेद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी आपले कार्यालय लोकपालच्या कक्षेत आणण्याचा बराच आग्रह केला होता. पण, मंत्रिमंडळाने तो अमान्य केला, अशी माहिती सूचना व प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्राने केली क्रूर थट्टा!
१६ ऑगस्टपासून अण्णांचे बेमुदत उपोषण

नवी दिल्ली, दि. २८ : ‘‘केंद्र सरकारने कार्पोरेटवर डोळा ठेवून अखेर ‘ङ्ग्रॅक्चर’ लोकपाल विधेयकच संमत करण्याची मनमानी केली आणि देशातील अब्जावधी जनतेला मूर्ख बनविले. देशाच्या जनतेशी केंद्र सरकारने केलेली ही क्रूर थट्टाच आहे. सद्य:स्थितीतील लोकपाल विधेयकाच्या चौकटीतून पंतप्रधान कार्यालय वगळण्यात आलेले आहे. हे विधेयक जर संसदेने संमत केले तर त्याला आम्ही आव्हान देऊ. हे विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी आम्ही १६ ऑगस्टपासून पुन्हा बेमुदत उपोषणावर बसू,’’असे भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.
‘‘राजधानी दिल्लीतील ‘जंतर मंतर’ येथे १६ ऑगस्टपासून मी बेमुदत उपोषणावर बसणार आहे. संपूर्ण देश माझ्यासोबत निषेध करेल. हा निषेध एकट्या अण्णा हजारे यांचा नसेल तर संपूर्ण देशाचा असेल. आपल्या स्वातंत्र्याचा दुसरा संग्राम म्हणून जनतेने याकडे पाहावे. सक्षम लोकपाल विधेयकासाठी जनतेने संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यांवर उतरावे,’’असे आवाहन अण्णा हजारे यांनी ‘राळेगण सिद्धी’ येथून केले.

No comments: