Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 26 July, 2011

स्थलांतरित मालमत्ता प्रकरणी खास अधिवेशन बोलवा : अनंत शेट

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): मयेतील स्थलांतरित मालमत्तेच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी आग्रही मागणी मयेचे आमदार अनंत शेट यांनी केली. गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी वर्षांत तरी मयेवासीयांना पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून सोडवा, अशी आर्त हाक त्यांनी सरकारला दिली आहे. केवळ राजकीय ‘स्टंटबाजी’साठी मये स्थलांतरित मालमत्तेचा विषय सोडवण्याच्या पोकळ घोषणा करून व आश्‍वासने देऊन येथील लोकांची थट्टा न करण्याचे आवाहनही आमदार शेट यांनी केले.
‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी एक म्हण प्रचलित आहे. मयेवासीयांची परिस्थिती यापेक्षा अजिबात वेगळी नाही, असे अनंत शेट म्हणाले. गोवा मुक्त होऊन आता पन्नास वर्षे उलटली, पण मयेवासीयांची गुलामगिरी मात्र काही केल्या संपत नाही. निदान गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मयेतील स्थलांतरित मालमत्तेचा विषय निकालात निघेल, अशी आशा होती. पण जनतेचे प्रश्‍न सोडवण्यापेक्षा फक्त पैसा कमावण्यातच दंग असलेल्या कॉंग्रेस सरकारकडून ती पूर्ण होणेच शक्य नाही, असेही आमदार शेट म्हणाले.
मये हा बहुजनसमाजबहुल मतदारसंघ आहे. बहुजन समाजाचे नेते म्हणून मिरवणारे रवी नाईक यांच्याकडेच स्थलांतरित मालमत्ता खाते आहे. गेली चार वर्षे त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की काय, याचाही आपल्याला संशय येतो, असा ठोसा आमदार अनंत शेट यांनी लगावला. मयेतील स्थलांतरित मालमत्तेचा विषय सोडवण्यापेक्षा आपले पुत्र रॉय नाईक याला या मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्याची घाई त्यांना झाली आहे. तिकडे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे तर मये मतदारसंघ म्हणजे आपली वैयक्तिक मिरासदारी असल्याच्या थाटात वक्तव्ये करत आहेत. मयेतील जनतेला विकासाच्या बाता सांगून आपल्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन ते करतात. आपले वडील प्रतापसिंग राणे यांनी एवढी वर्षे मयेवासीयांचा हा प्रश्‍न सोडवण्यासाठी काय केले, याचा हिशेब आधी विश्‍वजितनी द्यावा, असे आव्हान आमदार शेट यांनी दिले. फक्त पैशांच्या बळावर या मतदारसंघावर डोळा ठेवणार्‍यांना मयेतील स्वाभिमानी जनतेला अजून ओळखलेले नाही. येत्या निवडणुकीत मयेतील मतदार त्यांची खरी जागा त्यांना दाखवून देतील, असा विश्‍वासही आमदार अनंत शेट यांनी व्यक्त केला.
बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे रवी नाईक मयेबाबत उदास का? सरकारात आपला दबदबा असल्याचा आव आणणारे विश्‍वजित राणे मयेवासीयांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढे का येत नाहीत, असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले. फक्त मेळावे व बैठका बोलावून मयेवासीयांबाबत खोटा पुळका आणण्याचे प्रकार त्यांनी ताबडतोब बंद करावेत, असे सांगून मयेवासीयांच्या जखमांवर मीठ चोळून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी पुढे सरसावलेल्या नेत्यांनी मयेवासीयांपासून सावध राहावे, असा इशाराही आमदार अनंत शेट यांनी दिला.
विधानसभेत मयेतील स्थलांतरित मालमत्तेचा विषय काढला रे काढला की ‘झाले याचे रडगाणे सुरू’ या आविर्भावातच सरकार या विषयाकडे पाहते. सभापती प्रतापसिंग राणे अनेकवेळा टिप्पणी करतात. पण, हा प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारला खडसावण्याचे धैर्य ते कधीच दाखवत नाहीत. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तर या विषयाकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही. रवी नाईक हे ज्या पद्धतीने या विषयावरील प्रश्‍नांची उत्तरे देतात त्यावरून मुळात स्थलांतरित मालमत्तेचा विषय म्हणजे कवडीमोलाचा आहे, असा आभास निर्माण व्हावा. कॉंग्रेस आणखी किती काळ मयेवासीयांची थट्टा करणार आहे, असा प्रश्‍नही आमदार अनंत शेट यांनी केला आहे.

No comments: