Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 10 July, 2011

मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास : प्रा. अनिल सामंत

महालक्ष्मी मंदिरात ‘मातृभाषा रक्षण’ परिसंवाद
पणजी, दि.९ (प्रतिनिधी): मुळापासून इंग्रजी शिकणार्‍या मुलांचा सर्वांगीण विकास होत नाहीच, मात्र अशा मुलांना अकाली नैराश्य येण्याचे प्रमाण जास्त असते. शिक्षणतज्ज्ञांनी व मानसोपचारांनी केलेल्या निरीक्षण व संशोधनानंतर हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे पालकांनी इंग्रजीचा सोस सोडून द्यावा व आपल्या मुलांना किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिल सामंत यांनी आज येथे बोलताना केले.
पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजीत‘ मातृभाषा रक्षण’ या परिसवंदात ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, लेखक डॉ. प्रमोद पाठक, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे व निमंत्रक जयेश थळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे प्रा. सामंत म्हणाले की, इंग्रजी भाषा माध्यम हे देशापासून गोव्याला तोडण्याचे एक मोठे षड्यंत्र असून वेळीच सावध व्हावे. हे घडू दिल्यास गोव्याची अस्मिता, संस्कृती, प्रादेशिकता व इतिहास नष्ट होईल. भाषा ही पोटासाठी नसते तर ती व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी असते. भाषा स्वाभिमान जागृत करते. भाषा गेली तर अस्तित्वच नष्ट होईल असे प्रा. सामंत यांनी यावेळी सांगितले.
डॉ. पाठक यांनी यावेळी, सरकारने जाणून बुजून मराठी शाळांचा दर्जा खालावला असल्याने पालक इंग्रजीकडे वळले आहेत. सध्या इंग्रजीला मान आहे पण भविष्यात तो असेलच असे नाही.मात्र मराठी ही जुनी परुराणी भाषा असून ती सदैव सन्मान प्राप्त करून देते त्यामुळे इंग्रजीकडे धावणार्‍या पालकांनी याचा विचार करावा असे आवाहन केले.
या वेळी बोलताना जयेश थळी यांनी गोवा वाचवण्यासाठी व गोव्याचे आराष्ट्रीयीकरण रोखण्यासाठी लोकांनी देशाभिमानी राज्यकर्ते निवडून द्यावेत असे आवाहन केले.
कामत सरकारने अल्पशिक्षित व चरित्रहिन राजकारण्याच्या दबावाला बळी पडून जो इंग्रजीकरण करण्याचा चंग बांधला आहे तो देशद्रोह असून अशा पापी लोकांना देहान्ताची शिक्षा देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी केले. अल्पसंख्यांच्या मताला राजमान्यता देऊन सत्ताधारी समाजात फूट पाडत असून या अराष्ट्रीय कृत्याविरुद्ध प्रत्येक स्वाभिमानी गोवेकराने उठाव करत हे सरकार उलथून टाकावे असे आवाहन श्री. करमली यांनी केले.
गोव्यात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाची मागणी मातृभाषेतून शिक्षण हीच असताना गोवा सरकार अल्पसंख्यांकाच्या दबावाला घाबरून बहुसंख्यांवर अल्पसंख्यांकाची इंग्रजी माध्यमाची मागणी लादत आहे. बहुसंख्याकांच्या भावनांचा आदर न करणार्‍या सरकारला बहुसंख्यांकाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे प्रतिपादन रमेश शिंदे यांनी यावेळी केले. परेश प्रभू यांनीही यावेळी यांनीही आपल्या भाषणातून इंग्रजी माध्यमाला विरोध केला व पाचवीनंतरच इंग्रजी ठीक असल्याचे प्रतिपादन केले. सूत्रनिवेदन राजेश कोरगावकर यांनी केले.
------------------------------------------------------------------
विदेशी शिकू लागलेत मराठी
या कार्यक्रमात भारतीय संस्कृती व भाषा विशेषता मराठी भाषेची महती पटून ती आत्मसात करण्यासाठी गोव्यात राहणार्‍या फ्रान्स येथील सिरीयान पालीया यांनी आपण मराठी भाषा शिकत असल्याचे सांगून आपल्या मुलीला मराठी शाळेत दाखल केल्याचे सांगितले. यावेळी सिरीयाना पालीया व त्यांची मुलगी अनास्थासीया यांनी मराठी व संस्कृत प्रार्थना म्हणून दाखवल्या. मराठी व संस्कृत भाषा बोलल्याने व वाचल्याने मनाला शांती मिळून जीवनात सात्त्विकता निर्माण होते असा अनुभव आपल्यास आल्याने आपण मराठीचे अध्ययन करत आहे अशी प्रतिक्रिया सिरीयाना यांनी यावेळी व्यक्त केली.

No comments: