वास्को, दि. २७ (प्रतिनिधी): सरस्वती महिला मंडळातर्फे पुरवण्यात आलेल्या माध्यान्ह आहारात शिजलेली पाल सापडून मुरगाव हायस्कूलच्या ५२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर फरारी झालेल्या सदर मंडळाच्या प्रमुख ऊर्मिला साळगावकर अखेर आज मुरगाव पोलिसांना शरण आल्या. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली व न्यायालयाने ३ दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी साळगावकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र याचिका फेटाळण्यात आल्याने शेवटी त्यांना पोलिसांना शरण यावेच लागले.
गेल्या १५ जून रोजी सडा येथील मुरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सरस्वती महिला मंडळाने पुरवलेल्या माध्यान्ह आहारात पाल सापडल्याने विषबाधा झाली होती. आहारातून विषबाधा होण्याचे असेच प्रकार सरस्वती महिला मंडळाच्या बाबतीत यापूर्वी दोन वेळा घडले होते. यावेळी पोलिसांनी मंडळाच्या आचार्याला अटक केली होती. मात्र, ऊर्मिला साळगावकर त्या दिवसापासून फरारी होत्या. मुरगावचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी त्यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.
Tuesday 28 June, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment