केंद्रीय वनमंत्री जयराम रमेश यांचे राज्य सरकारला पत्र
पणजी, दि. २८(प्रतिनिधी): म्हादई अभयारण्याला व्याघ्र संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासंबंधी गोवा सरकारने प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना करणारे पत्र केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी राज्य सरकारला पाठवले आहे.
गोव्यात फक्त प्रवासी वाघ आढळून येतात हे खरे नसून इथे वाघांचे कायमस्वरूपी वास्तव्य असल्याचे अनेक पुरावे अभ्यासाअंती मिळाले आहेत. सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्य व्याघ्र संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यास इथल्या स्थानिक लोकांचाही पाठिंबा आहे व त्यामुळे तशा पद्धतीचा रीतसर प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवून द्यावा, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे. या निर्णयामुळे म्हादई क्षेत्रातील जैविक विविधतेचे व पर्यावरणाचेही रक्षण होईल व त्यामुळेच राज्य सरकारने गंभीरपणे या सूचनेवर विचार करून तात्काळ प्रस्ताव पाठवून द्यावा; जेणेकरून केंद्रातही त्याचा ताबडतोब पाठपुरावा करण्यास मदत होईल, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे.
कर्नाटकात भीमगड व दांडेली व्याघ्र संवर्धन क्षेत्रात एकूण ३५ वाघांचे वास्तव्य आहे. भारतीय अभयारण्य संस्थेने केलेल्या अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, गोव्यातील संरक्षित क्षेत्र तथा कर्नाटक व महाराष्ट्रातील घनदाट वनक्षेत्र हे पश्चिम घाटांतील वाघांसाठी उपयुक्त वसतीस्थान आहे. त्यामुळे इथे व्याघ्र संवर्धन क्षेत्र जाहीर झाल्यास या उमद्या परंतु, धोक्यात आलेल्या प्राण्याचे संरक्षण करणे खर्या अर्थाने शक्य होईल. रमेश यांच्या पत्रात हा संदर्भही देण्यात आला आहे.
Wednesday 29 June, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment