Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 14 January, 2011

महागाईचा विळखा कायमच..

केंद्राकडून केवळ आश्‍वासनांची खैरात
नवी दिल्ली, दि. १३
सर्वसामान्यांना घाम ङ्गोडणार्‍या महागाईचा स्तर किंचित घसरल्याचा दावा केंद्र सरकारने केला असला तरी
जीवनावश्यक वस्तूंच्या विशेषत: कांदा आणि टोमॅटोचे भाव अजूनही आकाशाला भिडलेले आहेत. त्यामुळे हे दर केव्हा खाली येणार, असा जीवनमरणाचा प्रश्‍न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. कारण सरकारकडून सातत्याने फक्त घोषणांची खैरात आणि महागाई कमी करण्याचे वायदे केले जात आहेत.
म्हणे १ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाईचा स्तर १८.३२ टक्क्यांवरून १६.९१ टक्क्यांपर्यंत खाली आला. पण, बाजारात अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत मात्र कुठलीही घसरण झाली नाही. उलट भाजीपाल्याच्या किमती ३.८४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कांद्याच्या किमती १.७३ टक्क्यांनी वाढल्या असल्यामुळे जनतेच्या डोळ्यांत वेगळ्याच अर्थाने पाणी तरळते आहे. दरम्यान, महागाई हाताबाहेर गेल्यामुळे सरकार आणि रिझव़्र्ह बँकेला अधिक कठोर पावले उचलणे भाग पडणार असल्याचे संकेत अधिकृत सूत्रांनी दिले आहेत.
वाढत्या महागाईला वेसण घालण्यासाठी सरकार येत्या एक-दोन दिवसांतच आणखीही ठोस उपाय जाहीर करणार असल्याची माहिती अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज दिली.
महागाई रोखण्यासाठी कोणती पावले उचलायला हवी, हे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले आहे. तशी घोषणा करणे हेच फक्त बाकी आहे, असे मुखर्जी म्हणाले.महागाईचा भस्मासूर रोखण्यात सरकार सक्षम आहे काय, असे विचारले असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले! कांदा, दूध, अंडी आणि मांस यासह अन्य भाजीपाल्याच्या किमती सामान्यांना परवडतील अशा स्तरापर्यंत खाली आणण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. महागाई वाढीमागे कुठली कारणे जबाबदार ठरत आहेत, याचा विचार करून महागाई रोखण्यासाठी कोणती पावले उचलायला हवी, याबाबतही निर्णय घेण्यात आले होते.

No comments: