Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 October, 2010

मोदींच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा

गुजरात अव्वल क्रमांकावर
२० कलमी कार्यक्रम
योजनेची कार्यवाही


नवी दिल्ली, दि. २८ - केंद्र सरकारच्या वीस कलमी कार्यक्रम योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकारने पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि ईशान्येकडील राज्यांनी याबाबतीत "तळ' गाठला आहे.
कॉंग्रेसेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी यासंदर्भात पहिले दहा क्रमांक पटकावले आहेत. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातर्फे आज येथे ही माहिती देण्यात आली. या वीस कलमी कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने गरिबी निर्मूलन आणि ग्रामीण विकास यावर प्रामुख्याने भर दिला जातो. ५१ गुणांसह गुजरात पहिल्या स्थानावर असून कर्नाटकने दुसरा तर झारखंडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. पंजाब व उत्तर प्रदेश यांचा क्रमांक त्यानंतर लागतो. केरळ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनीही चांगली कामगिरी बजावली आहे. यात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांनी विकासाचा धडाका लावल्याचे दिसून येते. कॉंग्रेसला ही वस्तुस्थिती स्वीकारणे फारच कठीण बनल्यामुळे त्या पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी ही यादी सदोष असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. विशेष म्हणजे केंद्रात कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर असून त्यांनीच ही यादी तयार केली आहे!
महाराष्ट्र, ईशान्येकडील राज्ये, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल यांची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचे अहवालात म्हटले आहे. समाजाच्या तळागाळातील घटकांसाठी घरांची बांधणी करणे, त्यांना आरोग्य, शैक्षणिक, पाणीपुरवठा, वीजपुरवठा यांसारख्या सुविधा नाममात्र दरांत उपलब्ध करून देणे असे या २० कलमी कार्यक्रम योजनेचे स्वरूप आहे. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांच्या सरकारने १९७५ साली ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. आता त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत बाजी मारली आहे ती गुजरातने. त्याबद्दल केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांनी गुजरात सरकारचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांना त्यांनी विकासकामांचा वेग वाढवावा, अशी सूचना केली आहे.

No comments: