Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 26 October, 2010

काश्मीरप्रश्नी 'भाजयुमो' करणार युवकांत जागृती : अनुराग ठाकूर

आज 'काश्मीर विलीनीकरण दिवस'
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): काश्मीर प्रश्नाबाबत केंद्राने घेतलेली भूमिका गुळमुळीत आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यात गांर्भीयाने लक्ष घालण्याची नितांत गरज आहे. हे काम केंद्रातील युपीए सरकारकडून होत नाही. त्यामुळेच "इंडिया फर्स्ट' कार्यक्रमांर्तगत देशभरातील तरुणांना काश्मीरप्रश्नी जागृत करण्याची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चाने घेतल्याचे आज भारतीय जनता पक्षाचे युवा खासदार तथा "भाजयुमो'चे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
देशभरात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. १९९४ मध्ये देशाच्या संसदेत घेण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते आज पणजीतील भाजप कार्यालयात पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपयुमोचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत व सचिव सिद्धेश नाईक उपस्थित होते.
पाकव्याप्त काश्मीर आणि त्याचा उत्तरेकडील भाग हा हिंदुस्थानाचाच भाग असून तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असा ठराव १९९४ मध्ये बहुमताने घेण्यात आला होता. त्याची कार्यवाही व्हावी, यासाठी केंद्र सरकारवर भाजपयुमो दबाव आणणार असल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले.
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू आणि काश्मीरचा गुंता वाढवून ठेवला आणि आता त्याचीच री कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी ओढत असल्याची टीका श्री. ठाकूर यांनी केली. २६ ऑक्टोबर १९४७ साली काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले होते. मात्र, हे सत्य दडपण्याचा प्रयत्न करून फुटीरतावादी गट आपली पोळी भाजण्याची चाल खेळत आहेत. याबाबत केंद्र सरकार ढिम्म आहे. त्यामुळे उद्या २६ ऑक्टोबर हा "काश्मीर विलीनीकरण दिवस' म्हणून पाळला जाणार आहे. तसेच, देशभर जागृती कार्यक्रम हाती घेऊन तरुणांना काश्मीर विषयाची माहिती करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण, आरोग्य तसेच भ्रष्टाचार हे विषय सध्या देशाला भेडसावत असले तरी, काश्मीरचा विषय हा ज्वलंत आहे. गेल्या वर्षभरात दीड हजार वेळा तेथे दगडफेक झाली. त्यात ११० जणांचा मृत्यू झाला. तेथील ओमर अब्दुल्ला यांचे सरकार या समस्येवर तोडगा काढण्यास पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरला बहाल केलेले ३७०वे कलम रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली.
अभिव्यक्तीच्या नावाखाली देश तोडण्याची जाहीर वक्तव्ये केली जातात. म्हणूनच, या देशाचे सरकार निष्क्रिय बनल्याचे आम्ही देशातील तरुणांना पटवून देणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.
-----------------------------------------------------------
'मीडिया'नेच बनविले राहुल गांधींना 'हिरो'
कॉंग्रेसचे राहुल गांधी यांना केवळ देशातील प्रसारमाध्यमांनी "हिरो' बनवले असल्याची टिपण्णी आज भारतीय जनता पक्षाचे युवा खासदार तथा भाजपयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केली. राहुल यांचा करिष्मा कोठेच दिसलेला नाही. खुद्द दिल्लीत राहुल यांना दिल्ली विद्यापीठातील निवडणुका जिंकता आल्या नाहीत. चारपैकी तीन उमेदवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विजयी झाले. त्यामुळे देशातील तरुण कोणाबरोबर आहेत ते स्पष्ट झाले आहे. तसेच, डेहराडून, राजस्थान, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड विद्यापीठातही "अभाविप' निवडून आली आहे, असे ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

No comments: