Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 5 August, 2010

दगाबाजीला मुत्सद्देगिरीने उत्तर

मागच्या लेखांकात दिल्याप्रमाणे महाराजांच्या आयुष्यातील चार प्रमुख प्रसंगांना अफजलखान वध, शाईस्तेखानावर चढाई, आग्य्राहून सुटका आणि सिंहगड विजय धरून त्यांच्या वर्णनातील सत्यासत्यतेबद्दल तोडलेले तारे आपण पाहिलेत. लेन त्याच्या पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणाचे (पृ. २०-४४) शीर्षक `The Epic Hero - Seventeenth Century Sources for the heroic legends of Shivaji` असे देतो. या प्रकरणात त्याने वरील चार घटनांना धरून लिहिले आहे. त्यामागचा त्याचा उद्देश `My Concren here is to analyse the way these events begin to form a narrative and in short, make a good story` (पृ. २०) त्या good story मध्ये इतरही रोमहर्षक घटनांचा समावेश होतो.
इस १६४८ मध्ये मुस्तफाखानाने दगाबाजीने शहाजीराजांना कैद केले. त्या दरम्यान महाराजांनी केवळ १९व्या वर्षी बेलसरच्या लढाईत फतहखानाला उघड्या मैदानात अंगावर घेऊन पुरंदराच्या गडावर पराभूत केले. एक कोवळा मुलगा विजापूरच्या फौजेला धूळ चारतो, या घटनेपासून महाराजांची story नव्हे history सुरू होते.
यानंतरची घटना बेड्या घातलेल्या अवस्थेत शहाजीराजांना विजापुरात मिरवून आणल्यानंतर, त्यांची मुत्सद्देगिरीने सुटका करणे होती. शिवाजी महाराजांनी मोगल शहाजादा मुरादबक्ष याच्याशी संधान बांधले आणि विजापूरकरांविरुद्ध मोगलांची चाकरी करण्यास येण्याचे दर्शविले. मुरादबक्षाने त्यांना पाच हजारी मनसब देण्याचे फर्मान दि. १४ ऑगस्ट १६४९ साली पाठविले. मोगलांचे आक्रमण नको त्यापेक्षा शहाजींची मुक्तता करणे चांगले अशा विचाराने विजापूरच्या आदिलशाही दरबाराने त्यांची मुक्तता केली.
महाराजांनी मैदानी युद्धात आणि दरबारी राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. हे करत असताना इतर मराठे अथवा रजपूत सरदारांप्रमाणे ते मोगल बादशहाच्या दरबारात हात बांधून मान खाली घालून हजर झाले नाहीत. ही चाकरी नसून हातमिळवणी होती. असेच नंतरही घडले. फक्त एकदाच काय ते महाराजांना मोगल बादशहाच्या दरबारात उभे राहावे लागले आणि आग्य्रावरून सुटकेचा प्रसंग घडला.
अफजलखानाच्या वधानंतर स्वराज्यावर आलेले संकट सिद्धी जौहरचे होते. महाराज पावसाळ्याच्या दिवसात पन्हाळगडवर अडकून पडले होते. तेव्हा सिद्धी जौहरशी शरण आल्याची बतावणी करून महाराज मोजक्या स्वारांनिशी रात्रीच्या अंधारात बाहेर पडले. थोडीही गडबड झाल्यास जिवावर बेतणारा तो डाव होता. तसे घडलेही पण बाजी प्रभूंच्या बलिदानाने, खिंड पावन झाली आणि लाखांचा पोशिंदा राजा विशाळगडावर पोहोचला.
याहीवेळी बोलणी करताना महाराजांनी आपल्या पत्रात सपशेल शरणागती पत्करून वडीलपणे स्वतःचे संरक्षण करण्याची सिद्धी जौहरला विनंती केली होती. पन्हाळ्याला महाराज अडकलेले असताना इंग्रजांनी दगाबाजी करून सिद्धी जौहरतर्फे स्वतःचे गोलंदाज लावून तोफा डागल्या होत्या. महाराजांच्या भेटीला नंतर साळसूदपणे आलेल्या इंग्रजी वखारीच्या प्रमुखाला व त्याच्या तीन साथीदारांना महाराजांनी कैद केले. इंग्रजांच्या वखारीची मराठ्यांनी लूट केली. महाराजांनी कैद करून ठेवलेल्या एका कैद्याने अँड्रुजने आपल्या देशबांधवांना समज दिली. "कंपनीच्या मालाचे रक्षण केले म्हणून ही कैद प्राप्त झाली नसून पन्हाळ्याच्या वेढ्यात जाऊन इंग्रजांचा बावटा फडकावून गोळे उडविल्याबद्दलचे हे प्रायश्चित्त आहे. शिवाजी नसता आणि दुसरा कोणी असता तरी ज्याला म्हणून असल्या अत्याचाराबद्दल सूड उगविण्याचे सामर्थ्य आहे तो असेच वागला असता. व्यापाऱ्यांनी दारूगोळ्यासारखा माल विकावयाचा नसतो किंवा शत्रू सैन्यावर उडवायचा नसतो. (पत्र दि. २० मार्च १६६२ शि.प.सा.सं. पृ. २१० पत्र क्र. ७४).

No comments: