Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 3 August, 2010

अफझलवधाची विश्वासार्ह माहिती

अफजलखान वध या कसोटी पाहणाऱ्या संकटातून निवारून महाराज विजयी झालेत. हिन्दू स्वतंत्रपणे लढू शकतात, महाबलाढ्य मुस्लिम सरदारांना शक्ती आणि युक्तीच्या जोरावर नामशेष करू शकतात हा विश्वास त्यामुळे हिन्दुसमाजात जागृत झाला. परकीय वखारींनीही या घटनेची नोंद घेतली आणि त्याचे अहवाल आपआपल्या देशात पाठविले. महाराजांचे अतुलनीय शौर्य आणि विजयश्री खेचून आणण्याच्या कर्तृत्वाचे वर्णन अनेक भारतीय लेखकांनी अचूकपणे पण भावपूर्ण शब्दांत केले आहे. इथे सेतुमाधवराव पगडींनी त्या घटनेवर केलेले अचूक भाष्य देतो. With the death of Afajalkhan and the destruction of his army, The struggling Maratha State emerged trumphantly from the critical danger in which it had found itself. Shivaji`s boldness, great darings, readiness to face risk at great dangers to his life, his strategic planning and wise generalship, made a deep impression on friends and foes alike. In this first crisis, Shivaji showed that he was a born leader of men. In the struggle for an independent state, the Swarajya, there was no turning back' (पगडी पृ १०३).
सेतू माधवराव पगडी लिहितात, त्याप्रमाणे अफजलखान वधामुळे स्वराज्याची मुहूर्तमेढ पक्की रोवली गेली. जनमानसात त्याबाबत असणारी अनिश्चितता दूर झाली. आता परत फिरणे शक्य नव्हते. अफजलखान वध हा स्वराज्य स्थापनेतील पहिला महत्त्वाचा टप्पा असल्याने त्याबाबत अनेक शिवचरित्रकारांनी पुरावे आणि अस्सल कागदपत्रे शोधून त्याच्या आधारे ही घटना केव्हा घडली कशी घडली याची विस्ताराने चर्चा केली आहे. आणि जसे जसे पुरावे आणि कागदपत्रे मिळत गेली तसे तसे अफजलखान वधाच्या घटनेचे व नंतर मराठ्यांनी त्यांच्या सैन्यावर केलेल्या टप्प्यांचे वर्णन अधिक विश्वसनीय होत गेले. त्या पुराव्यांची छाननी करून त्यातील विश्वासार्ह पुरावे कोणते या बाबतही मतमतांतरे नोंदविली गेली. भारतीय संशोधक मिळालेल्या पुराव्यांचे खंडन मंडनही करत होते. अफजलखान वधाच्या संदर्भात त्या घटनेची शुुद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करणारा ग्रंथ सैनिक पेशाच्या कॅ.ग.वा. मोडक यांनी इ.स. १९२७ मध्ये प्रकाशित केला. त्यांनी केलेल्या लिखाणातील त्रुटी दाखविणारा लेख पुरुषार्थ मासिकाच्या मार्च १९३३ च्या अंकात (पृ. ४३ ते ५०) डॉ. माधव सदाशिव केळकर यांनी लिहिला होता, अशी माहिती मेहेंदळे तळटिपेत देतात. (मे मेहेंदळे १/१ पृ ८८५)
"अफजलखान प्रकरणी उद्भवणाऱ्या काही शंकांचे येथेच समाधान करणे अगत्याचे होईल, असे लिहून विजय देशमुख पृ ३५८ ते ३६४ मध्ये अनेक पुराव्याविषयी मत नोंदवतात (श.शि. पूर्वार्ध पृ ३५८ ते ३६४). ही पुराव्याची शहानिशा १९८० साली म्हणजे जेम्स लेन २५ वर्षापूर्वी शिवचरित्राकडे वळला त्याच्या आधीची आहे.
अज्ञानदास शाहिराने त्याच्या पोवाड्यात लिहिल्याप्रमाणे अफजलखानाने शिवाजी महाराजांवर चालून येताना तुळजापूरला जाऊन भवानीची मूर्ती फोडणे शक्य नाही. ते त्याने पूर्वी केव्हातरी केले असावे, असे स्पष्ट मत से.मा. पगडींनी १९७४ साली नोंदविली आहे. र् Paramanand states that afzalkhan arrived rapidly at wai. This would rule out the possibility of his going out of the way to Tulajapur. He musthave at some time previously, carried out acts of Vandalism at Tulajapur (पगडी पृ ९६) सखोल संशोधनात्मक असलेल्या व १९९९ साली प्रकाशित शाळेच्या मेहेंदळेंच्या महाशिवचरित्रातही त्यांनी नोंदविले आहे की "ज्या अर्थी शिवभारतासारखे विश्वसनीय साधन अफजलखानाने तुळजापूरच्या भवानीचा अपमान केल्याचे सांगते, त्या अर्थी त्याने तुळजापूरच्या भवानीच्या देवळास काहीतरी उपद्रव दिला होता हे निश्चित आहे. परंतु विजापूरहून वाईला येत असताना तो तुळजापूरला गेला असण्याचा संभव नाही हे नकाशावर नजर टाकताच दिसून येते. तेव्हा त्याने ते कृत्य पूर्वी केव्हातरी केलेले होते आणि अज्ञानदासाने व सभासदाने त्याच्या त्या कृत्याची त्याच्या शिवाजीवरील स्वारीशी गल्लत केली आहे, असे दिसते. (मेहेंदळे १/१ पृ ९०८) .त्याच पानावर मेहेंदळे आपल्या समर्थनार्थ तळटीपही देतात-तुळजापूर विजापूरच्या ईशान्य-उत्तरेस सुमारे १४० कि.मी. मीटरवर आहे आणि वाई विजापूरच्या वायव्येस सुमारे २२५ किलोमीटरवर आहे. (मेहेंदळे तळटीप क्र. ८८ पृ ९०८) .
मेहेंदळे यांनी तर फार खोलात जाऊन अफजलखान वधाशी संबंधित अनेक पुराव्याची छाननी केली आहे. त्यांच्या परिशिष्ट ग्रंथ २ परिशिष्ट क्र. ५४ ते परिशिष्ट क्र. ६१ म्हणजे पृ ११८४ ते १२४१ इतका भरगच्च मजकूर अनेक पुराव्यांची छाननी करणारा आहे. तसेच चरित्र ग्रंथातही "अफलजखानचा वध' या प्रकारच्या प्रारंभीच मेहेंदळेंनी साधनाच्या विश्वसनीयतेवर टीप लिहून (१/१ पृ. ८०४ - ८०५) नंतर तळटिपा दिल्यात याची संख्या २०६ आहे (पृ ९४२).
हे सर्व नमूद करण्याचे कारण पुरावे व ऐतिहासिक साधनांची विश्वासनीयता याबाबत भारतीय व प्रामुख्याने महाराष्ट्रीय संशोधक जागृत होते. ते पुराव्याची छाननी करूनच चरित्र लिहीत होते.

No comments: