Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 4 August, 2010

जेम्सची विसंगत विधाने

जेम्स लेनने दोन महत्त्वाचे संदर्भ दिले आहेत. ते दोन्ही महाराजांचे समकालीन आहेत. अज्ञानदासांचा पोवाडा आणि परमानंदाचे शिवचरित्र या दोन्हींमध्ये महाराजांचा उल्लेख अवतारी पुरुष म्हणून केला आहे. हे त्याकाळातील लेखन पद्धतीला धरून आहे. हे दोघेच नव्हे तर समर्थ रामदासंानीही शिवाजी महाराजांना अवतारी पुरुष म्हणूनच मानले आहे. ते लिहितात -
जे सत्किर्तीचे पुरुष। ते ईश्वराचे अंश।
धर्मस्थापनेचा हव्यास। तेथेची वसे।।
हिंदू महाराजांना ईश्वरी अवतार समजत होते तर मोगल त्यांना "सैतानाचा अवतार' मानत होते.(श.शि. उत्तरार्ध पृ. ४९५) आणि अवतार कल्पना, पुनर्जन्म या गोष्टी हिंदू धर्म आणि हिंदूच्या मानसिकतेचा अविभाज्य अंग आहेत. एखाद्या थोर पुरुषाचा गौरव करायचा तर त्याची अवतारी पुरुषात गणना करणे ही प्रथाच सुमारे शंभर वर्षापर्यंत हिंदू समाजात प्रचलित होती.
मात्र जाता जाता जेम्स एक वैचारिक पाचरखुंटी मारून जातो. तो लिहितो - Looking back from the caronation in 1674, the killing of Afzal Khan in 1659 was not simply an act of courage, it was premiditated violence in service of the brahminic world order.
अवतारीत्व - किंवा अवतार कल्पना केवळ Brahminic नसून Whole Hindu World Order होती व आहे. कारण शिवाजी महाराजांना अवतारी पुरुष मानणारा शाहीर अज्ञानदास किंवा विठ्ठलभक्त शेख महंमदांना संत कबीराचा अवतार मानणारे (स्वतः जेम्स लेन पृ. १६) वारकरी हे जेम्स लेनच्या भाषेत सांगायचे तर were part and parcel of the Hindu World Order.

शाईस्ताखान
जेम्स लेनचे इतिहासाचे व त्यावेळच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचे ज्ञान अकटोविकट आहे. त्याला ३५० वर्षापूर्वीची आणि आता शहरीकरण झाल्यानंतरची सामाजिक परिस्थिती यात फरक करता येत नाही. तो शाईस्ताखानाच्या स्वारीच्या संदर्भात लिहितो - 'Soon after the Afzal Khan incident, Shivaji lost the city of Pune to the Mughals and Shaista Khan took up residence in the house known as Lal Mahal' (पृ.२५).
आज पुण्याचे स्वरूप एका महाकाय शहराचे असले तरी शिवकाळात पुण्याचा विस्तार कसबा पेठेपुरताच मर्यादित होता व लोकसंख्या शेकड्यात होती. त्यामुळे शाहिस्ताखानाने पुणे शहर काबीज करून फार मोठा पराक्रम केला असे झालेले नव्हते. स्वतःच्या वरील विधानाला खोटे ठरविणारे विधान लेन पुढील पानावर करतो. बाजीरावाने पुण्याचे from a Market town to a grand city रूपांतर केले(पृ. ४७). लेनच्या लिखाणात अशा तफावती आहेत.
शाईस्ताखानाच्या घटनेच्या संदर्भात लेन लिहितो - Thus, for early mention of the Shaista Khan episode, we have only a brief mention in the Jedhe documents (जेधे एकावली) and full acount given by Sabhasad.' (पृ २५). पृ २६ वर त्याने चिटणीस बखरीतील वर्णनाचा उल्लेख केला आहे. त्याच्या मते हे तिन्ही संदर्भ परस्पर विरोधी विधाने करणारे आणि म्हणून विश्वसनीय नाहीत. त्यांच्या पुढची पायरी म्हणजे जेम्स लेनचा पुढल्या पिढीतील चेला ती मिथ्यकथा आहे हे ठरवून मोकळा होईल.
शाईस्ताखानाच्या बोटे कापण्याच्या संदर्भात खुद्द महाराजांनी पत्राद्वारे रावजी सोमनाथ यांना माहिती कळविली. इंग्रजांच्या पत्रात त्या संदर्भात A letter from the Rajah written by himself to Raoji असा उल्लेख शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ मध्ये १२ एप्रिल १६६३ च्या गीफर्डच्या पत्रात आहे. कॉस्म - द- गार्द्र आणि निकोलाय मनुची हे समकालीन लेखक या घटनेचा उल्लेख करतात. इतकेच नव्हे तर मनुची शाईस्ताखान दख्खनमध्येच राहण्यासाठी हटून बसला असताना औरंगजेबाने त्याला जबरदस्तीने बंगालच्या सुभ्यावर हाकलले हे नमूद करतो. या उलट जेम्स लेन लिहितो की शाईस्ताखान - ' is so fearful of future attack, that he retreats in disgrace to the mughal capital and is reassigned to distant, for safer Bengal' (पृ २६) जेम्स लेनपेक्षा मनुची अधिक विश्वसनीय आहे.
शाईस्ताखानाची बोटे कापल्याची घटना केवळ मराठी संदर्भ साधनापुरती मर्यादित नसून परकीयांनी ही त्याची नोंद करून ठेवली आहे. त्यांनी किती लोक मारले गेले, किती जखमी झाले ते कोणत्या दर्जाचे होते याची ही माहिती दिली आहे. (शि.प.सा.सं. खंड १ पृष्ठ २२५ - २२६, पत्र क्र. ९३०)
वीस वर्षे अभ्यास केल्याचे लेन सांगतो. त्याला महाराजांच्या चरित्रातील घटनांची, नोंद महाराष्ट्रीयच नव्हे तर त्या काळच्या इतर लोकांच्या पत्रव्यवहारातून घेतल्याची माहिती असू नये?

No comments: