Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 4 August, 2010

कोकण रेल्वे मार्ग खुला

वाहतुकीबाबत अनिश्चितता
मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी): कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी ते असोडे दरम्यान कोसळलेल्या दरडीचे ढिगारे हटविण्याचे काम पूर्ण झाले असून आता रेलमार्गाला बळकटी देण्याचे काम सुरू झाले आहे. तथापि, मुंबईकडील रेलवाहतूक पूर्ववत कधी होईल याबाबत मात्र अद्याप कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.
रेल्वे मार्गावरील अडथळे दूर झाल्याचा "एसएमएस' आज सायंकाळी सर्वत्र गेल्याने रेल्वे प्रशासनाबरोबरच अन्य आस्थापनांनीही सुटकेचा श्वास सोडला. गेल्या २३ जुलैपासून बंद झालेला हा मार्ग पूर्ववत कधी सुरू होईल याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
रत्नागिरीजवळ निवसर येथे रेल्वे मार्गाखालील भराव वाहून गेलेल्या जागी पुन्हा भराव घालून त्याला बळकटी दिलेली असली तरी त्याची चाचणी बाकी आहे. दरड कोसळलेल्या पोमेंडी, निवसर, कोंडवी बोगदा व असोडे येथील कोसळलेल्या दरडीची माती हटविण्याचे काम गेल्या रविवारपर्यंत ९० टक्के पूर्ण झाले होते. काल आणि आज तेथे पावसाने मदत केल्याने कामाला वेग देऊन संपूर्ण दरड हटविली गेली.
पावसामुळे काही ठिकाणी ओली माती रुळावर येण्याचे काम सुरूच होते. पोमेंडी येथे कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या भिंतीबाबत उपाय घेण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या काश्मिरातील प्रकल्पावर काम करणाऱ्या तीन अभियंत्यांना पाचारण करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाय घेतले गेले व ते यशस्वी ठरले अशी माहिती सूत्रांनी दिली.
असोडे येथील २०० मी. लांबीचा मार्ग बदलून झाल्यावर एकंदर मार्गाची चाचणी घेतली जाईल व त्यानंतरच नियमित वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहितीही सूत्रांनी दिली.

No comments: