Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 12 June, 2010

देशात दुसरे कंदहार होणार?

कसाबच्या सुटकेसाठी विमान अपहरणाची शक्यता

विमानतळांच्या सुरक्षेत वाढ


मुंबई, दि. ११ - मुंबई हल्ल्यातील अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्या सुटकेसाठी अतिरेकी संघटना विमान अपहरणाचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती मिळाल्याने विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
ब्युरो ऑफ सिव्हील ऍव्हिएशन आणि सीआयएसएफकडून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव दयाळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कसाबला मागील महिन्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तो भारतीय तुरुंगात राहणे आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच त्याची सुटका करण्याचा ते प्रयत्न करतील. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई विमानतळाहून प्रवासी विमानाच्या अपहरणाचा कट आखला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी काश्मिरातील अतिरेकी कारवायांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मौलाना मसूद अजहरच्या सुटकेसाठी अतिरेक्यांनी कंदहार विमान अपहरण केले होते. त्याची मोठी किंमत भारताला मोजावी लागली होती.
आता कसाबच्या सुटकेसाठीही असा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे ब्युरो ऑफ सिव्हील ऍव्हिएशन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे.

गुजरात विमानतळावर सतर्कतेचा इशारा
सुरक्षा व्यवस्थेत वाढ

अहमदाबाद - केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा मिळाल्यामुळे येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अतिरेकी हल्ल्याची भीती व्यक्त करणारा सतर्कतेचा इशारा प्राप्त झाल्यामुळे आम्ही कोणताही धोका न पत्करता विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळावरील प्रवाशांची व त्यांच्या सामानांची तपासणी केली जात आहे. याशिवाय संशयास्पद स्थितीत आढळून येणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी व तपासणी केली जात आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेला सतर्कतेचा इशारा हा नियमित बाब आहे. तसेही देशातील सर्वच विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. मंत्रालयाकडून इशारा प्राप्त झाल्यानंतर या व्यवस्थेचा आढावा घेतला जात असतो आणि गरज पडल्यास त्यात वाढ केली जात व्यवस्था आणखी बळकट केली जात असते, असेही हा अधिकारी म्हणाला.

No comments: